
पणजी : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याबाबतचा समाजमाध्यमांवरील अपप्रचार थोपवण्यास कसेबसे यश आलेल्या राज्य सरकारसमोर आता नवीन आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या ११ दिवसांत बुडून सातजणांचा मृत्यू झाल्याने गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न राष्ट्रीयच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
त्यामुळे छोट्यातील छोटी गोष्टही लागलीच जगभरात पोहोचते. गोव्यात गेल्या ११ दिवसांत बुडून साजणांचा मृत्यू झाला ही बाब त्यास अपवाद नाही. यासंदर्भातील मोठी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविली अशा स्वरूपाच्या नकारात्मक चर्चांना उत्तरे देत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास सरकारची मोठी दमछाक झाली असतानाच हे नवे ‘नकारात्मक’ संकट उभे ठाकले आहे.
गोव्यातील समुद्रकिनारे तसेच दूधसागर धबधबा, नद्या, धबधबे, तलाव आदी जलस्रोतांच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजना विशेषतः जीवरक्षक असूनही अशा घटना घडत असल्याने सरकारी यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मृत्यूंपैकी बहुतांश घटना धोकादायक ठिकाणी जलक्रीडा किंवा आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तर काही घटनांमध्ये सुरक्षाव्यवस्था पुरेशी कार्यरत नव्हती, असे स्थानिकांनी सांगितले.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर नियमांनुसार जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असते. तसेच, हॉटेल्सच्या स्विमिंग पुलांजवळ जीवरक्षक नेमणे अनिवार्य आहे. परंतु या अंमलबजावणीच्या बाबतीत निद्रिस्त प्रशासनाची आणि हॉटेल्सचालकांची जबाबदारीही अधोरेखित झाली आहे.
अशा हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर कठोर कारवाई गरजेची
गोव्यातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगले पर्यटकांना ‘स्विमिंग पूल’ची सुविधा देतात. मात्र तेथे जीवरक्षक नियुक्त करणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी ही नेमणूक केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात ती होत नसल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत पर्यटन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी हवीच
राज्य सरकारने काही धोकादायक ठिकाणी ‘नो अॅक्सेस’ आणि ‘नो स्विमिंग’चे फलक लावले असले तरी काही ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी केवळ सूचनाफलक लावून प्रशासन जबाबदारीतून मोकळे झाले आहे. प्रत्यक्ष ठिकाणी पोलिस वा वनविभागाचे कर्मचारी किंवा जीवरक्षकांची उपस्थिती नगण्य असल्याचे दिसून आले आहे. पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करून नदीत वा तलावांमध्ये उतरतात आणि दुर्घटना घडतात.
अदृश्य धोके आणि निष्काळजीपणाचा फटका
समुद्राची भरती-ओहोटी, तळाचे अचानक बदलणारे स्वरूप, प्रवाहाची तीव्रता आदी बाबींचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक धोका ओळखू शकत नाहीत. अशा वेळी जीवरक्षकांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. त्यांना अशा परिस्थितीत कसे काम करावे याचे प्रशिक्षण दिले जाते; परंतु काही दुर्घटनांमध्ये जीवरक्षक वेळेवर पोहोचू शकले नाहीत, हेसुद्धा तेवढेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.