

पणजी: अंमली पदार्थविरोधी पथकाने पणजीतील कदंब (केटीसी) बसस्थानकाजवळील सर्कलवर मोठी कारवाई करत अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५ लाख रुपये किमतीचा जवळपास १५ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी रात्री ७.४५ ते ११.३० या वेळेत ही कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी मूळ झारखंड येथील भागीरथ कुमार सिंग (३१) याच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीचा ७.९२३ किलो गांजा जप्त केला. तसेच, मूळ झारखंड येथील प्रशांत कुमार सिंग (२७) याच्या ताब्यातून सुमारे ७ लाख रुपये किमतीचा ७.०३० किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
दोघांकडून एकूण १४.९५३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १५ लाख रुपये आहे. याप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ मधील कलम २०(बी)(२)(बी) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य सूत्रधार बेपत्ता : अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी हा अंमली पदार्थांचा साठा अखिलेश गुप्ता (३१, बिहार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. अखिलेश गुप्ता हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि पुरवठादार असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या तो बेपत्ता असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.