
पणजी: परराज्यांतील ज्या कंपन्यांनी गोव्यात आस्थापने सुरू केलेली आहेत, त्यांनी गोव्यातील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीच्या मुलाखती गोव्यातच घ्याव्यात आणि नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांना यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. कामगार खाते यावर नियंत्रण ठेवून आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गोव्यात आस्थापने असलेल्या 'एमआरएफ' कंपनीने फोंड्यातील युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या २५० जागा भरण्यासाठी कुडाळ-सिंधुदुर्ग येथे भरती मेळावा आयोजित केल्याची जाहिरात हाती पडताच आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) अध्यक्ष मनोज परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
राज्यात बेरोजगारी वाढत असताना गोव्यात आस्थापने स्थापन करण्यास मंजुरी मिळालेल्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी गोव्याबाहेर मुलाखतींचे आयोजन करून परराज्यांतील कर्मचाऱ्यांना गोव्यात आणू पाहत आहेत.
त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची अट ठेवून गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून (आयपीबी) आस्थापनांना मान्यता या मिळत असतानाही या कंपन्या स्थानिकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यावर तत्काळ तोडगा काढावा.
अन्यथा आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा सरदेसाई आणि परब यांनी दिल्यानंतर 'एमआरएफ ने फॉड्यातील युनिटमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आम्ही कुडाळमध्ये भरती मेळावा आयोजित केलेला नव्हता.
तर, शुक्रवारी फर्मागुढी येथील आयटीआयमध्येच भरती मेळावा आयोजित केल्याचे स्पष्टीकरण जारी करीत, त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध केली. त्यानुसार, शुक्रवारी या कंपनीने फर्मागुढी येथे भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या.
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता, परराज्यांतील ज्या कंपन्यांनी गोव्यात आस्थापने सुरू केलेली आहेत, त्यांनी गोव्यातील आस्थापनांमधील भरतीसाठी गोव्यातच मुलाखतींचे आयोजन करावे आणि स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने त्यांना यापूर्वीच दिलेले आहेत. यावर कामगार खाते लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारकडून कंपन्यांना अभय का? : मनोज परब
गोव्यात आस्थापने असलेल्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी इतर राज्यांमध्ये मुलाखती आयोजित करीत आहेत. असे प्रकार वारंवार घडत आहेत. तरीही सरकार यावरून सारवासारव करीत आहे. अशा कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. सावंत अशा कंपन्यांना अभय देत आहेत.
यावरून राज्यातील भाजप सरकार स्थानिकांचे रोजगार चोरत असल्याचे दिसून येते. हा प्रकार गोवा आणि गोमंतकीयांसाठी धोकादायक आहे, अशी टीका 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब यांनी केली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.