
पणजी: बरेच दिवस ताणल्या गेलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (१८ मार्च) दिल्लीत बरेच दिवस रखडलेल्या या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार किमान अर्धेअधिक मंत्री बदलले जाण्याची शक्यता असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दिल्ली दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेने मोठी गती घेतली आहे. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी पंधरा दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारापैकी एकट्या आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे उर्वरित सात जणांपैकी मंत्रिपदासाठी उत्सुक असलेले आमदार गेले काही महिने अस्वस्थ होते, त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामे मार्गी लावून त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी वर्तुळातून करण्यात येत होता.
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत असल्याकारणाने ते राजकीय भेटी घेतील अशी अटकळ होतीच. अपेक्षेप्रमाणे त्यांनी शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बदलाच्या विषयाला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे मानले जात आहे.
फेरबदल की खातेबदलही ?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर आता केवळ मंत्रिमंडळ फेरबदल होणार आहे, की खातेबदलही त्या जोडीला होणार आहे, याविषयीची उत्सुकता निश्चितपणे वाढली आहे. मात्र, याचा खुलासा मुख्यमंत्री गोव्यात आल्यानंतरच होणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आगमनाकडे इच्छुक आमदारांचे डोळे लागून राहिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.