
पणजी: विधानसभेचे कामकाज तीनच दिवस चालवले जाणार असल्याने विरोधी आमदारांनी आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीत नाराजी व्यक्त केली. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी समितीची बैठक १० मिनिटांत आटोपली गेली यावरून काय ते समजा असे नमूद केले.
या बैठकीला प्रकृती अस्वास्थामुळे आमदार विजय सरदेसाई उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांनी सभापतींना उद्देशून लिहिलेले पत्र पाठवले होते. त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की वर्षभरात किमान ५० कामकाजाचे दिवस विधानसभेचे असले पाहिजेत, हे उद्दिष्टही साध्य होत नाही.
ही लोकशाही मूल्यांची थट्टा असून सखोल चर्चेला टाळण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांचे भाषण हिवाळी अधिवेशनात होते, मात्र त्यावर उत्तर देण्यासाठी आम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत थांबावे लागते.
तसेच, मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, विरोधी पक्षाला पुढच्या अधिवेशनातच त्यावर उत्तर द्यावे लागते. या विलंबामुळे मूळ भाषण अप्रासंगिक ठरते, आणि विरोधकांना सरकारच्या दाव्यांचे तात्काळ पुनरावलोकन करता येत नाही. यामुळे सखोल चर्चेची संधी नष्ट होते.
समिती कामकाज दिवस ठरवत नाही!
सभापती रमेश तवडकर यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले, की ही समिती कामकाजाचे दिवस ठरवत नाही. राज्याचे मंत्रिमंडळ कालावधी ठरवते. त्यानुसार त्या दिवसातील कामकाज समिती ठरवते. आजच्या बैठकीत अधिवेशनाच्या कमी कालावधीबद्दल विरोधी आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.