
पणजी: गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान येथे मंगळवारी १० वा 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना मंत्री जाधव यांनी, पारंपरिक औषधोपचारांद्वारे मिळणारे प्रतिबंधात्मक उपचार हे जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात, असे सांगितले.
कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी देखील मार्गदर्शन केलं.
प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेदाच्या जागतिक महत्त्वावर भर देत सांगितलं की, आयुर्वेदाला एक समग्र आरोग्य सेवा प्रणाली म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, २३ सप्टेंबर ही आयुर्वेद दिनाची कायमस्वरूपी तारीख निश्चित करणं ऐतिहासिक पाऊल आहे.
ही तारीख शरद ऋतूतील विषुववृत्तीशी जुळते, जे निसर्गातील संतुलनाचे प्रतीक आहे आणि आयुर्वेदिक तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे. या दिवसाद्वारे आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासोबतच, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांचा प्रसार आणि त्याचे महत्व अधिक प्रभावीपणे अधोरेखित करता येईल.
राज्यपाल अशोक गजपती राजू म्हणाले की, राज्यपाल गेल्या दशकभरात आयुर्वेद दिन केवळ एक राष्ट्रीय उत्सव न राहता, आता तो जागतिक आरोग्य चळवळीचा भाग बनला आहे. सध्या १५० पेक्षा जास्त देशांमध्ये आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल बोलताना त्यांनी NAMASTE पोर्टल आणि आयुष HMIS (Health Management Information System) यांसारख्या डिजिटल माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. ही डिजिटल साधने आयुर्वेदाची पोहोच आणि पुराव्यावर आधारित उपचार पद्धती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं सांगितलं.
राज्यपालांनी गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि समृद्ध आयुर्वेदिक वारशाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, आयुर्वेद केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून तो एक जीवनशैली आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. गोव्यामध्ये आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा संगम करून एक अनोखे आरोग्य पर्यटन मॉडेल विकसित करण्याची क्षमता आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी जीवनशैलीशी निगडीत आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाच्या महत्त्वाबद्दल आपले विचार मांडले. लठ्ठपणा, मधुमेह आणि ताणतणाव यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेद अत्यंत प्रभावी असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी दैनंदिन दिनचर्या आणि हंगामी दिनचर्या यांसारख्या प्राचीन संकल्पनांवर भर दिला. या संकल्पना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी एक शाश्वत मॉडेल तयार करतात. तसेच, दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदातील सोपी साधने किती उपयुक्त आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.