Goa 12 th Result : बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची फेरमूल्यांकनासाठी धावाधाव; विज्ञान शाखेला सर्वाधिक फटका

Goa 12 th Result : गेली अनेक वर्षे ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागत होता. यावर्षी अचानक हे प्रमाण १०.४६ टक्क्यांनी घटल्याने अनेक विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. या निकालामुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे.
goa hsc result 2024
goa hsc result 2024 Dainik Gomantak

Goa 12 th Result :

पणजी, यंदा गोवा शालान्त मंडळाने जाहीर केलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटल्याने अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका फेरमूल्यांकनासाठी धावाधाव सुरू केली आहे.

गेली अनेक वर्षे ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागत होता. यावर्षी अचानक हे प्रमाण १०.४६ टक्क्यांनी घटल्याने अनेक विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. या निकालामुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. गेल्या वर्षी १९ हजार ३७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यापैकी १८ हजार ४९७ उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १० हजार २९१ (५५.६३ टक्के) जणांना ६० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले होते, तर २,३७१ विद्यार्थ्यांना (१२.८१ टक्के) जणांना ८१ ते १०० टक्के गुण मिळाले होते. मात्र, यावर्षी २०२४ मध्ये या दोन्ही श्रेणींतून विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५,७४३ (३८.५८ टक्के) जणांना ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण, तर १,२६१ विद्यार्थ्यांना (८.४७ टक्के) ८१ ते १०० टक्के गुण मिळाले आहेत.

विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व गणित या विषयात विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने त्यांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. दहावी परीक्षेत ९० पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ६५ ते ८० टक्के यादरम्यान घसरली आहे. दहावीला गणित विषय लेव्हल-१ व लेव्हल-२ अशा दोन स्तरांवर घेण्यास पर्याय असतो.

त्यामुळे जे विद्यार्थी लेव्हल-२ घेऊन गणित विषय घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, त्यांना हा गणित विषय अधिक कठीण गेला आहे. अनेक विद्यार्थी ‘जेईई’ व ‘नीट’ या परीक्षेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे शाळेत शिकविला जाणारा अभ्यास तसेच कोचिंग क्लासेस या द्विधा स्थितीत ते सापडतात. कोचिंग क्लोससमध्ये गणिते सोडवण्याच्या शॉर्टकट पद्धती शिकवल्या जातात. मात्र, शालांत मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सोडवण्यात आलेल्या गणिताच्या पद्धतीला गुण दिले जातात. हीच पद्धत भौतिकशास्त्र विषयामध्ये अवलंबिली गेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण या प्रकारामुळे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत एका उत्तरपत्रिका तपासणी मॉडरेटरने व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका फेरमूल्यांकनासाठी सोय केली आहे. ही सोय संबंधित शाळांमध्ये उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा व्यवस्थापनाकडून मंडळाच्या पोर्टलवर पाठवण्यात

येत आहेत.

‘जेईई’ पात्रतेबाबत संकट

अनेक विद्यार्थ्यांना जेईई परीक्षा पात्रतेसाठी आवश्‍यक असलेल्या गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. त्यांना मिळालेल्या कमी गुणांमुळे शिक्षण यंत्रणेवरील विश्‍वासच उडाला असल्याने विद्यार्थ्यांनी फोटो कॉपी तसेच फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.

अंतर्गत, क्रीडा गुण कळविलेच नाहीत!

राज्यातील तीन उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांनी गोवा शालान्त मंडळाला काही विद्यार्थ्यांचे अंतर्गत तसेच क्रीडा गुण कळविलेच नाहीत. होणारा विलंब लक्षात येताच गोवा शालान्त मंडळाने या विद्यालयांना प्रथम ३० मार्च आणि नंतर १० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ती वेळही टळून गेल्‍याने संबंधित विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहिले.

तीन मेपर्यंत अर्ज करण्यासाठी मुद

फोटो कॉपीसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल आहे, तर उत्तरपत्रिका फेरमूल्यांकनासाठी ३ मे ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर अर्जांची पडताळणी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना कळविली जाईल, अशी माहिती गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com