पणजी, सरकारने कितीही गाजावाजा करून विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक शाखांचे अकरावीत एकत्रिकरण करणार असल्याचे सांगितले असले तरी आजपासून अकरावीचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच सुरू झाले.
उच्च माध्यमिक विद्यालयांनी जुन्याच माहिती पुस्तिकेच्या आधारे प्रवेश देणे सुरू केले आहे. दरम्यान, या शाखांचे एकत्रीकरण झाले असे मानून अकरावीत प्रवेश घेण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांच्या कार्यालयात पोचलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना त्यामुळे जोरदार धक्का बसला. ‘पर्यायी विषय निवडू द्या’ अशी विनंती त्यांनी करणे सुरू केले. त्यावर ‘जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर पाहू’ असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शाखांचे एकत्रिकरण याच शैक्षणिक वर्षापासून केले जाईल असे जाहीर केले होते. गोवा शिक्षण मंडळ बारावीच्या प्रमाणपत्रांवर विद्याशाखा नोंदवणार नाही तर केवळ विषय नोंदवेल असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यास काही तास असताना त्यांनी घाईघाईने ही घोषणा केली होती. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या घोषणेची अंमलबजावणी होईल असा सर्वांचा समज झाला होता. पालक व विद्यार्थ्यांनी कोणते पर्यायी विषय निवडल्यास बारावीत चांगले गुण मिळवता येतील, याचेही नियोजन केले होते. त्यानुसार आज अकरावीत प्रवेश मिळेल असे त्यांना वाटले होते. मात्र त्यांचा हिरमोड झाला.
शिक्षण संस्था चालक व प्राचार्यांनीही नव्या पद्धतीने अकरावीत प्रवेश देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शिक्षण खाते जारी करेल याची कालपर्यंत वाट पाहिली होती. मात्र तशी सूचना किंवा परिपत्रक शिक्षण खात्याने यंदा जारी न केल्याने गेल्या वर्षीच्या धर्तीवरच प्रवेश देण्यात येत आहे.
विषय निवडताना विद्यार्थ्यांना करावा लागेल खूप विचार : भगीरथ शेट्ये
१ बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर विज्ञान, वाणिज्य, कला किंवा व्यावसायिक विद्याशाखा असा यंदापासून उल्लेख नसेल. उच्च माध्यमिक विद्यालयांत उपलब्ध शिक्षक, तासिका आणि एकंदर शैक्षणिक व्यवस्थापनाचा ताळमेळ घालून विद्यालयांच्या पातळीवर विविध विषयांचे पर्याय विद्यालये देऊ शकतात. या साऱ्या मर्यादा जमेस धरूनच विद्यार्थ्याला विषय निवड करावी लागेल, असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.
२ सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाकडे वळणारे कोणते विषय निवडतात ते ठरून गेलेले असते. सनदी लेखापाल होऊ इच्छिणाऱ्यांचे विषय ठरलेले असतात. यंदा त्यांना त्या-त्या विद्याशाखेतील मुख्य विषयासह अन्य विद्याशाखेतील एखादा विषय निवडण्याची संधी मिळू शकते, असेही शेट्ये म्हणाले.
अकरावीच्या प्रवेशावेळी विद्याशाखा एकत्रित झाल्या असतील असे गृहीत धरून पालक व विद्यार्थी आज आले होते. त्यांची समजूत काढावी लागली.
शिक्षण खात्याने काही कळवले नाही याचा अर्थ प्रवेशपद्घतीत बदल नाही असा आम्ही घेतला. सरकारने आधी जाहीर केल्याने त्याची अंमलबजावणी होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र तसे झालेले नाही.
- प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, अध्यक्ष (हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.