फोंडा
म्हारवासडा - उसगाव येथील मांस प्रकल्पात ईद सणाचे कारण पुढे करून दोनशे बैलांची कत्तल करण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असून त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जबाबदार असल्याचा आरोप परशुराम गोमंतक सेनेतर्फे करण्यात आला आहे. परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी हा आरोप केला असून या प्रकाराला सेनेचा विरोध असल्याचे सांगण्यात आले.
म्हारवासडा येथे सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली, त्यावेळी सेनेचे सचिव आदिश उसगावकर, खजिनदार सीताराम हरमलकर व परशुराम शेट्ये व इतर सदस्य उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात हिंदू व ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या सणांवर नियंत्रण ठेवून हे सण मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुस्लीम बांधवांना ईद सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी आता सरकारचेच प्रोत्साहन मिळत असून ईदसाठी दोनशे बैलांची कत्तल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रकाराला आमचा ठाम विरोध असून गोवा मांस प्रकल्पात या दोनशे बैलांची आवक होणार असल्याने सेनेचे कार्यकर्ते त्यावर नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या या दुटप्पी धोरणाबद्दल आणि कोरोनाप्रती बेफिकिरपणाबद्दल सेना तीव्र निषेध करीत असल्याचे शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले.
- sanjay ghugretkar
|