

पणजी : गोमंतकीय जनतेबरोबरच पर्यटकांनाही दर्जेदार व शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाला आहे. २०२६ मध्ये भेसळमुक्त अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विभागाने आत्तापासूनच व्यापक मोहीम हाती घेतल्याची माहिती संचालक श्वेता देसाई यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
२०२५ मध्ये एफडीएने हजारो किलो पनीर, चिकन, गूळ आणि निकृष्ट दर्जाचे काजू जप्त केले होते. त्यामुळे खळबळ माजली होती. ‘‘गेल्या वर्षी आम्ही अनेक मोठ्या कारवाया करून भेसळ करणाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते.
आता २०२६ मध्येही आम्ही हीच तत्परता आणि कडक धोरण कायम ठेवणार आहोत’’ अशी ग्वाही संचालकांनी दिली आहे. त्यामुळे विनालेबल, मुदत संपलेले किंवा आरोग्यास घातक रंग व रसायने वापरून अन्नपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
कोणत्याही पदार्थावर लेबल नसल्यास किंवा दर्जाबाबत शंका असल्यास त्वरित एफडीएकडे तक्रार करण्याचे आवाहन देसाई यांनी केले आहे.
तसेच जे विक्रेते स्वच्छतेचे नियम पाळणार नाहीत किंवा ग्राहकांच्या जिवाशी खेळतील, त्यांच्यावर केवळ दंडच नाही तर दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. २०२५ मध्ये एफडीएने उत्तर आणि दक्षिण गोव्यात एक हजाराहून अधिक अचानक तपासण्या केल्या आहेत.
यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, हॉटेल्स, बेकरी आणि घाऊक विक्रेत्यांचा समावेश आहे. नियमभंग करणाऱ्या आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून, मुदतीत बदल न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने बंद देखील करण्यात आली आहेत.
पर्वरी येथील एका रिपॅकिंग युनिटवर छापा टाकून चुकीच्या तारखा आणि अस्वच्छ साठवणुकीमुळे ७०० किलो पनीर नष्ट.
केरी, मोले आणि पत्रादेवी या सीमा नाक्यांवर तपासणीवेळी विनालेबल १७६० किलो चिकन, ५०० किलो पनीर आणि १० किलो खवा जप्त.
प्रयोगशाळेतील चाचणीत ‘टार्ट्राझिन’ आणि ‘सनसेट यलो’ या घातक कृत्रिम रंगांचा वापर आढळल्याने ६०० किलो गूळ नष्ट.
कळंगुट, बागा या पर्यटनपट्ट्यात निकृष्ट दर्जाचे काजू विकणाऱ्या दुकानांवर छापे टाकून दंड. काही दुकाने सील.
म्हापसा मार्केटमध्ये रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे, केळी जप्त करून नष्ट.
प्रत्येक सीमा नाक्यावर बाहेरून येणाऱ्या अन्नपदार्थांची कसून तपासणी केली जाणार आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि विशेषतः पर्यटन पट्ट्यातील काजू दुकानांची कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तपासणी केली जाईल.
आंबे आणि केळी कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी प्रतिबंधित रसायनांचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
* ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या फिरत्या प्रयोगशाळांद्वारे बाजारपेठांमध्ये जागेवरच दूध, तेल आणि मसाल्यांची चाचणी केली जाईल.
केवळ कारवाईवर न थांबता एफडीएने ३५०० हून अधिक फेरीवाल्यांना अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच ‘इट राईट इंडिया’ मोहिमेअंतर्गत ‘इट राईट मेळावे’, वॉकेथॉन आणि दोन फिरत्या प्रयोगशाळांद्वारे अन्न चाचणी व प्रबोधन केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.