

पणजी: केवळ जिंकून येण्याची क्षमता या निकषावर जिल्हा पंचायत उमेदवार ठरवलेले नाहीत. पक्षनिष्ठा, संघटनात्मक काम आणि पक्षाव्यतिरिक्त जनमानसांत असलेली छबी अशा निकषांचा विचार उमेदवारी देताना केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
भाजपचे ४० उमेदवार जाहीर केले आहेत. त्या प्रक्रियेबाबत त्यांनी सांगितले, की केवळ आमदारांनी नावे सुचवली म्हणून उमेदवारी मिळाली, असे झालेले नाही. लोकशाही पद्धतीने पूर्णतः पारदर्शक पद्धतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात अमुक व्यक्तीला मिळालेली उमेदवारी त्या व्यक्तीला का मिळाली याची माहिती भाजपच्या तेथील कार्यकर्त्यांना आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक होणार हे आधीच ठाऊक असल्याने मंडळ पातळीवर उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया निवडणुकीची चर्चा सुरू होण्याआधीच सुरू केली होती. मंडळ पातळीवरून मतदारसंघनिहाय २-३ नावे आल्यावर त्यावर सखोल चर्चा करण्यात आली. म्हापसा व मडगाव येथे घेतलेल्या बैठका त्यासाठीच होत्या.
कोणी नाव सुचवले तर ते का, याची कारणे द्यावी लागली होती. त्यातही पक्षाने मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करून घेतले होते. पक्षाचे कार्यकर्ते व पक्षाबाहेरील पक्षाचे हितचिंतक यांचे म्हणणेही जमेस धरण्यात आले. त्यातून उमेदवार निश्चित करण्यात आले. मुळात उमेदवार कधीपासून पक्षाचा सदस्य आहे याचाही विचार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पक्ष आपल्या ध्येय धोरणांपासून दूर गेलेला नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांनी पक्षाला प्रदेश पातळीवर दिलेला विचारांचा वारसा आजही कायम आहे, हे दाखवून देणारी ही उमेदवार निवड प्रक्रिया होती, असे सांगून ते म्हणाले, उमेदवाराचे चरित्र, चारित्र्य, अनुभव, पक्षनिष्ठा याचा विचार करण्यात आला. उमेदवार हा नवा चेहरा व तरुण असावा हेही पाहिले गेले. पारदर्शक पद्धतीने बैठका झाल्या आणि सर्वानुमते उमेदवाराची निवड झाली. सुरवातीला २-३ नावे समोर आली असली तरी चर्चेनंतर एकाच नावावर एकवाक्यता झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.