
पणजी: फातोर्डा मतदारसंघातील विकासकामांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आहे. त्याला वेगळा कोन जोडताना सरदेसाई यांनी आमदार गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकण्याची हिंमत दामू दाखवतील का अशी विचारणा केली.
दामू म्हणजे काय ते गावडे यांनी सांगितले आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला असे वर्णन चपखल आहे. दामू एकदा नव्हे तीनवेळा पराभूत झाले आहेत. मतदारसंघ फेररचनेमुळे एकदा पराभव झाला असेल, पण दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पराभव का झाला. चौथ्यांदा कशाला पराभव होणार आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी नाही.
कारण ते फातोर्ड्याचे कोणीच नव्हेत. ते उगाचच सिग्नेचर प्रोजेक्ट असे मोठाले शब्द वापरत आहेत. ते आणि दिगंबर (कामत) एकत्र येत १ लाख ३७ हजार चौरस मीटर शेतकऱ्यांची जमीन ट्रक टर्मिनससाठी पाच रुपये दराने संपादीत केली होती. तो त्यांचा सिग्नेचर प्रकल्प असू शकतो असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही समाजविरोधी कृत्ये होऊ नयेत, बलात्कार होऊ नयेत, चोऱ्या होऊ नयेत यासाठी तो प्रकल्प बंद पाडला असे नमूद करून ते म्हणाले, त्या जमिनीवर अद्याप त्यांचा डोळा आहे. बृहद् आराखडा त्यासाठीच त्यांनी आणला आहे. फातोर्डा हा मडगावचाच एक विस्तारीत भाग असला तरी फातोर्डावासीयांचा स्वाभिमान काय ते फातोर्डावासीयांनी तीनवेळा दाखवून दिले आहे.
फातोर्ड्यात आम्ही केले ते दृष्टीस पडते. कॉंग्रेसमध्ये कामत असताना दामूंचे त्यांच्याशी सख्य होते यावरून काय ते समजा. फातोर्ड्यात मलजल वाहिनीचा प्रश्न मोठा होता. सत्तेत आल्यावर किमान समान कार्यक्रमात मलजल वाहिनी प्रकल्पाला मी चालना दिली. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी असा काय प्रकल्प कार्यक्रमात समाविष्ट करता अशी विचारणा केली त्यावेळी त्याचे महत्त्व मी त्यांना पटवून दिले. तो आता पूर्णत्वास आला आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
सत्ताधारी आमदाराने केलेले आरोप गांभीर्याने घ्यायचे असतात. विरोधी आमदाराने सरकारवर आरोप केले, तर तो आमदार विरोधात आहे म्हणून आरोप करतो असा युक्तिवाद करता येतो. मात्र, सत्ताधारी आमदार, जो काल परवापर्यंत मंत्रिमंडळात होता, तो आरोपांचा पुनरुच्चार करतो त्याला हलक्यात घेता येणार नाही. जनतेसोबत आहे हे दाखवण्यासाठी त्या आमदाराने केलेली कृती हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र, त्याने केलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी नमूद केले.
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्याबाबत प्रतिक्रिया देण्यास कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी नकार दिला. प्रतिक्रिया देणे किंवा न देणे हा आपला अधिकार असल्याचे नमूद करून पत्रकारांना प्रतिक्रिया देण्याने काय होते हे आपण पाहिलेच आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले, प्रतिक्रिया न देणे सध्याच्या घडीला योग्य असे मला वाटते. पत्रकार चांगले काम करत आहेत. विधानाचा अर्थ कसा काढावा हे पत्रकारांकडून मी शिकत नाही. वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.