Congress leader Alka Lamba Criticized CM Pramod Sawant: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे. राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसही हार मानायला तयार नाहीये. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विविध प्रकरणांतून 1000 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी केला. लांबा यांनी या घोटाळ्याची सीबीआय किंवा ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली.
दरम्यान, लांबा यांनी मंगळवारी काँग्रेस हावस येथे पत्रकार परिषद घेवून भाजपवर टिकास्त्र डागले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर आणि एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा यावेळी उपस्थित होते.
‘‘प्रमोद सावंत हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ‘मास्टर प्लॅन’ सार्वजनिक केला नाही, पण त्यांच्या भांडवलदार मित्रांना याची जाणीव आहे. गोव्यात एक किलोमीटर अंतराचा रस्ता बनवण्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. अशा विविध प्रकल्पांतून मुख्यमंत्र्यांनी 1000 कोटींचा घोटाळा केला,’’ असा घणाघात लांबा यांनी पत्रकार परिषदेतून केला.
लांबा म्हणाल्या की, ‘‘गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. गोव्यात पीडब्ल्यूडीच्या नोकऱ्या 30 ते 40 लाख रुपयांना विकल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातच नोकऱ्या दिल्या आहेत. या नोकऱ्यांची यादी त्यांनी जारी करावी असे आव्हान मी त्यांना करते.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी कधी सुरु करणार का? असा सवाल देखील त्यांनी विचारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान भाजपला बदलायचे आहे, असा हल्लाबोल लांबा यांनी केला. ‘‘RSSच्या घटनेची सांगड आम्ही आमच्या भारतीय संविधानाशी घालू देणार नाही,’’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
“भाजप भारतीय संविधानाच्या जागी आरएसएसची घटना आणण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबासाहेबांचे संविधान गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म-जात असा भेदभाव करत नाही, परंतु आरएसएसची घटना असा भेदभाव करते. त्यांची घटना विष पसरवते. त्यामुळे आम्ही भाजपला भारतीय संविधानाची जागा आरएसएसच्या घटनेला घेऊ देणार नाही,’’ असे म्हणत लांबा यांनी भाजपवर शरसंधान साधले.
लांबा पुढे म्हणाल्या की, ‘’मोदी सरकारमध्ये लोकशाही, एकता आणि आपले संविधान धोक्यात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ‘पक्षांतरविरोधी कायदा’ अधिक मजबूत केला पाहिजे. परंतु नरेंद्र मोदींनी सत्ता बळकावण्यासाठी हा कायदा कमकुवत केला. मात्र एकदा आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षांतर करणाऱ्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करुन पक्षांतरविरोधी कायदा अधिक मजबूत करु. गोव्यात भाजप पक्षांतराला प्रोत्साहन देत आहे.’’ मोदी पक्षांतरविरोधी कायदा मजबूत करण्यास का विरोध करत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.
‘’देशात महिलांविरोधी गुन्हे वाढले आहेत. जिथे डबल इंजिनची सरकारे आहेत, तिथे महिला सुरक्षित नाहीत. परंतु हे थांबवले पाहिजे. ब्रिजभूषणशरण सिंह, संदीप सिंग साईनी, कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोदी आणि डबल इंजिन सरकार अशा गुन्हेगारांना आश्रय देत आहे,’’ असेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, सध्या माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. रेवन्ना हे लैंगिक छळात गुंतलेले असून एसआयटी स्थापन झाल्यानंतर ते जर्मनीला पळून गेल्याचे लांबा यांनी सांगितले. "प्रज्वल रेवन्ना यांनी जवळपास 1000 महिलांचा लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे, त्याचे व्हिडिओ देखील सार्वजनिक आहेत. मोदी सरकार आणि त्यांची टीम या प्रकरणांवर का बोलत नाही? ते अशा गुन्हेगारांना आश्रय का देत आहेत,” असा सवाल लांबा यांनी विचारला.
गोव्यातही मुख्यमंत्री प्रमोद सावंत सिद्धी नाईक हत्याकांडावर मौन बाळगत असल्याचे त्या म्हणाल्या. “भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या सूचनांसह जाहीरनामा तयार केला. आम्ही सरकार बनवल्यानंतर लोकांना न्याय देऊ, ”असेही त्या पुढे म्हणाल्या.
लांबा शेवटी म्हणाल्या की, “मोदी भारताच्या एकात्मतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमध्ये ते फेल ठरले. काँग्रेस हिंदूंची मंगळसूत्रे मुस्लिमांना देईल असे म्हणणे मोदींना शोभत नाही. निवडणूक आयोगही यावर कोणतीही कारवाई करत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, परंतु कर्ज दुप्पट झाले. मात्र आमचे सरकार स्थापन झाले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु आणि शेती क्षेत्र जीएसटीमुक्त करु."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.