
Goa IIT Project Protest: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘केवळ विरोधासाठी प्रकल्पाला विरोध करू नका’ असे आवाहन केले असले, तरी कोडार गावातील आयआयटी प्रकल्पावरून ग्रामस्थ आणि सरकार यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी आता आपल्या गावाच्या राखणदाराला गाऱ्हाणे घालून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोडार येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या मते, आयआयटीसारख्या मोठ्या प्रकल्पामुळे गावातील शेती आणि बागायती नष्ट होणार आहेत, ज्यामुळे गावची नैसर्गिक समृद्धी धोक्यात येईल. याशिवाय, ज्या ठिकाणी गावाच्या राखणदाराची चुडी पेटते, त्या ठिकाणी कुंपण बांधले जाणार असल्याने, गावकऱ्यांचा त्या जागेवरील हक्काचा मार्ग कायमचा बंद होणार आहे. 'कोडार गाव आणि बेतोडा पंचायतीमधील दगडी जमीन' असे कागदपत्र तयार करून हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या गावच्या देवतेला साकडे घातले. त्यांनी गाऱ्हाणे घालताना, 'गावच्या सरपंचाला सद्बुद्धी मिळावी आणि त्याने हा प्रकल्प मागे घ्यावा' अशी विनंती केली. तसेच, येत्या आठ दिवसांत यावर योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा हे प्रकरण आणखी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. जर सरपंचांनी रविवारपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावली नाही, तर पंचायतीवर किंवा थेट सरपंचाच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, त्यांना हे प्रकरण वाढवायचे नाही, पण जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर त्यांना कठोर पावले उचलावी लागतील. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळत आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनीही या आंदोलनाला समर्थन दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.