चोर्ला घाटाचे ‘दुखणे’ कधी संपणार? कठडे मोडले

दिशादर्शक फलकांचा अभाव, गटारे तुडुंब भरलेली
Chorla Ghat
Chorla Ghat Dainik Gomantak

संजय घुग्रेटकर

चोर्ला : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याचा महत्त्वाचा दुवा म्हणून चोर्ला घाट महत्त्वाचा आहे. या घाटातून तिन्ही राज्यांशिवाय इतरही अन्य राज्यातील प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. हा घाट जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्याची सुरक्षितताही महत्त्वाची आहे; परंतु सद्यःस्थितीत मोठ-मोठी वळणे, मोडलेले संरक्षक कठडे, तुटलेल्या लोखंडी कडा यामुळे या चोर्ला घाटाचे ‘दुखणे’ कधी नष्ट होणार, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आह.

गतवर्षी गटारात पडलेली झाडे उचलली नसल्याने रस्त्याच्या बाजूला ती तशीच पडून हेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकाचा पत्ताचा नाही, अशा अनेक त्रुटी या घाट रस्त्यांसंदर्भात आहेत. त्या त्वरित संबंधित खात्याने दूर करणे गरजेचे आहे.

Chorla Ghat
काणकोण महामार्ग दुरुस्ती, निर्णय 30 पर्यंत : काब्राल

घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, धुकेही असते. अशा परिस्थितीत भरधाव धावणारी वाहने दरीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून पावसाळ्यात गटारे कचरा, लाकडांनी भरलेली असल्याने पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण होऊनही चोर्ला घाट रस्ता धोकादायक बनलेला आहे.

बेळगाव - गोवा प्रवासासाठी सर्वांत जवळचा रस्ता म्हणून चोर्ला घाटाला पसंती दिली जाते. बेळगाव, कोल्हापूर, हैद्राबादकडे जा-ये करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढलेली असून रस्त्यावर कुठेही रिफलेक्टर्स नाहीत.

त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. काही वेळेला वाहने रस्त्यांच्या कडेला असलेल्या लोखडी संरक्षक कठड्याला धडकत आहेत. अनेक ठिकाणी मोडलेले लोखंडी कठडे अद्याप दुरुस्त केले नाहीत.

रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर या गोष्टी करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्‍त्यावर अनेक ठिकाणी मोठी वळणे आहेत, त्या ठिकाणी संरक्षक कठड्याची नित्तांत गरज आहे. मोडलेल्या कठड्यामुळे वाहने थेट दरीत कोसळण्याची भीती आहे. रस्ता चांगला असल्यामुळे वाहनांचा वेगही वाढलेला आहे.

अवजड वाहतूक सुरूच

अवजड वाहनांना बंदी असूनही भरदिवसाही अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे इतर वाहनांना अडचण निर्माण होत आहे. सकाळी-संध्याकाळी आंतरराज्य धावणाऱ्या खासगी बसेसची संख्याही मोठी आहे.

अवजड वाहने व मोठ्या बस एकत्र येतात, तेव्हा मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इतर वाहनांच्या रांगा लागतात. संबंधितांनी अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कड्यांचे परीक्षण हवे

घाटांतील कड्यांचे परीक्षण करण्याची गरज आहे. ज्यावेळी घाटात कडी कोसळतात, त्यावेळीच त्या कड्यांकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर कड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी गेल्यावर्षी कडा कोसळून माती रस्त्यावर आली होती.

रस्त्यांवरील माती काढली, पण गटारे अजूनही माती, कचऱ्याने भरलेली आहेत. यंदाही गटारे नेमकेपणाने उपसली नाहीत, तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. तसेच मोठा पाऊस सुरू व्हायच्या पूर्वीच कड्यांचे परीक्षण करून सुरक्षेसाठी उपाय करायला हवेत, असे प्रवाशांचे मत आहे.

धोकादायक झाडे : अंजुणे धरण ते कर्नाटक सीमेपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या स्‍थितीत आहेत. तसेच काही ठिकाणी गेल्यावर्षी पडलेली झाडे अद्याप तशीच आहेत. सुकलेली झाडे यंदा पडण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी गटारात गेले वर्षभर पडलेली झाडे न काढल्यामुळे, तसेच इतर कचरा, लाकडांमुळे गटारे भरलेली आहेत. ही गटारे दुरूस्तीबरोबरच धोकादायक धाडे त्वरित हटविणे गरजेचे आहे, अन्यथा पावसाळ्यात या पडणाऱ्या झाडांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

वाहतूक पोलिस हवा : चोर्ला घाटात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घाटात वाहतुकीवर नियंत्रणासाठी पोलिस व्यवस्था हवी. कर्नाटकच्या संपूर्ण हद्दीत पोलिसांची गाडी फिरत असते, त्याप्रमाणे गोव्यानेही व्यवस्था करायला हवी.

केरीत पोलिस बाहेरील वाहनांनाची तपासणी करतात. पण घाटात होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीकडे मात्र दुर्लक्ष करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त असणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com