
पणजी: चांदोर ही गोव्याची अनेक वर्षे राजधानी होती. त्यामुळे हा गाव आता गोव्याचा वारसा ग्राम म्हणून विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. या गावाचा ऐतिहासिकदृष्ट्या कशाप्रकारे विकास करावा हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमून लवकरच कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे पुराभिलेख तथा परातत्त्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
गोवा विद्यापीठात गोव्याच्या (Goa) इतिहासावर आयोजित परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान फळदेसाई म्हणाले, गोव्यात ज्यावेळी जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायजेशन व्हायला हवे होते, त्यावेळी ते करण्यात आले नाही. त्यामुळे कागदपत्रांमध्ये बदल करून जमीन बळकावणे असे अनेक प्रकार समोर आले. कारण आम्ही कागदोपत्रांची योग्य काळजी घेतली नाही. सरकारने आता जुन्या दस्ताऐवजांचे डिजिटलायजेशनचे काम सुरू केले असून १० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. येत्या अर्थसंकल्पात यासाठी आम्हाला अधिक बजेट देण्यात येणार आहे.
पूर्वी जुनी पोर्तुगीज (Portuguese) भाषेतील कागदपत्रे, दस्ताऐवजांचा अनुवाद करण्यासाठी अनुवादक नेमले नव्हते. त्यामुळे एखादा व्यक्ती जे अनुवाद करून दस्ताऐवज द्यायचा तेच न्यायालयातही सादर केले जायचे, परंतु आता सरकारने पोर्तुगीज दस्ताऐवज भाषांतरीत करण्यासाठी अनुवादक नेमले आहेत. पोर्तुगीज भाषेतून मजकूर भाषांतरीत करण्यासाठी प्रती पान ३३५ रुपये आकारले जातात, पूर्वी प्रत्येकजण वेगवेगळे दर आकारत होते, असे फळदेसाई यांनी सांगितले.
जुन्या दस्ताऐवजांचे मायक्रोफिल्म, डिजिटलायजेशन तसेच कागदोपत्रांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात असलेली कागदपत्रे त्या तालुक्यातच डिजिटलायजेशन करण्यात येतील. या कामासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.