

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पूजा नाईकने मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांची नावे घेतल्यानंतर ‘आप’चे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर अधिकच आक्रमक झाले. गुन्हेगारीसंदर्भातील अनेक खटले हाती घेऊन ते जिंकलेल्या पालेकरांनी यावेळी पूजा नाईकला कायदेशीर बाबतीत पूर्ण मदत करण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे वकिलीसोबतच ‘राजकारणा’तही सक्रिय असलेले पालेकर या प्रकरणात सुदिन ढवळीकरांना अडकवणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.∙∙∙
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आपल्याकडून पैसे घेतलेल्या आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता उत्तम पार्सेकर यांनी आपल्याशी वेळोवेळी जो संवाद साधलेला होता, त्याचे रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये होता. तो मोबाईल डिचोली पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर तो म्हार्दोळ पोलिसांकडे देण्यात आल्याचे आपणास सांगण्यात आले. आता म्हार्दोळ पोलिस तो मोबाईल आपल्याला दिल्याचे सांगतात. परंतु, तो मोबाईल आपणास मिळालाच नसल्याचे या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईकने रविवारी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे पोलिसांकडे असलेला पूजाचा मोबाईल वर्षभरापासून कुठे आहे? तिच्या म्हणण्यानुसार तिने रेकॉर्ड केलेले संभाषण अजून त्यात असेल का? आणि पोलिसांनी ते ऐकून त्यावेळीच तपास का केला नाही? असे अनेक प्रश्न जनतेत उपस्थित होणार आहेत.∙∙∙
मडगावात बेकायदेशीर बांधकामांना, कृत्यांना ऊत आला आहे. विरोधक दररोज अशी प्रकरणे उघड करीत आहेत, मालभाट मधील रस्त्यावर वीज खात्याचा ट्रान्सफॉर्मर आत घेऊन क्लब हाऊस उभारण्यात आल्याचे विरोधक सांगत आहेत. काही नेते तिथे जाऊन पाहणी करून आले. पाहणीच्या वेळी काही लोक म्हणत होते, ‘आरे काशिनाथ शेट्येक आपयात’. काशिनाथ शेट्ये अल्पकाळासाठी मडगावात होते, पण येथील राजकारण्यांना त्याचा वावर रुचला नाही. लगेच त्यांची बदली करण्यात आली. आता तर त्यांना परत बोलावले तर आता तर येथील राजकारण्यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे काशिनाथ शेट्येचा मडगावात निभाव लागणार का? हाच प्रश्न सर्वांना पडला असावा.∙∙∙
गोवा फॉरवर्ड पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळालेल्या ॲड. अमित सावंत यांनी रविवारी व्हिडिओ व्हायरल केला. ११ मिनिटे आणि १३ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे, त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांना सल्ला दिला आहे. त्यांनी फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर यांच्याविषयी आत्मपरीक्षण करण्यास सांगितले आहे. मांद्रे, पेडणे आणि बार्देशच्या काही भागात कळंगुटकर चांगलेच परिचित आहेत. सावंत यांनी जो सल्ला दिला आहे, त्यामागील सत्य सावंत यांनाच पुरते माहीत असणार आहे. अखेर सावंत यांनी वकिली भाषेत सरदेसाई यांना आवाहन केले आहे, असे स्पष्टपणे जाणवते. कदाचित यापुढे शाब्दिक वाद वाढलाच तर सावंत हे कोण काय करतो, हेच सांगून तर जाणार नाहीत ना, अशी चर्चा सध्या मांद्रेत सुरू आहे. ∙∙∙
रायबंदर-चोडण फेरीबोट सेवा मार्गावर रो-रो फेरीसाठी चार चाकी वाहनांसाठी पाच रुपये दरवाढ केली आहे. त्या दरवाढीला चोडणवासीयांनी विरोध केला. सुरुवातीला असणारेच दर ठेवावेत, असे त्यांचे म्हणणे. रविवारीही फेरी शुल्काचा मुद्दा निघाला. विशेष बाब म्हणजे आमदार प्रेमेंद्र शेट बैठकीस उपस्थित होते. खरेतर नदी परिवहन खाते अगोदरच ८० कोटी रुपयांत तोट्यात आहेच. परंतु जर मनोहर पर्रीकर यांनी ज्यापद्धतीने फेरीबोट सेवा मोफत केली होती आणि फेरीबोट सेवेतील कर्मचाऱ्यांना इतर खात्यांत बदल्या केल्या होत्या, तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. त्यासाठी नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही बाब लक्षात आणून दिली तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचेल. त्याचबरोबर अकाऊंटही विभागाचेही काम कमी होऊन तेथील कर्मचारीही इतरत्र वळवता येऊ शकतो. विशेष बाब म्हणजे केवळ चोडण मार्गावर काम करणाऱ्या टीसींवर दहमहा नदी परिवहन खाते दहा लाख रुपये खर्च करते, आणि महिन्याला यांच्याकडून खात्याला नऊ ते साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळते, म्हणजे सरळ-सरळ ५० हजारांचा तोटाच, हे उदाहरण सर्व सांगण्यासाठी पुरेसे आहे.∙∙∙
‘जॉब स्कॅम’ सध्या गाजत आहे. सुदिन ढवळीकर यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असून मगो समर्थकांनी देवांना साकडे घालून आता ‘देवा तूच बघरे बाबा!’ अशी देवावरच भिस्त ठेवली आहे. गोव्यात काही झाले, तरी देवाला उठवले जाते, हे आता सर्वमान्य आहे. पर्रीकर, विष्णू वाघांनी देवांना साकडे घालण्याचे सत्र सुरू केले. देवाकडे कोण जातो? ज्याचे कुठेच काही साधत नाही, तोच शेवटी देवाला साकडे घालतो, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिकट झाली आहे का? अशी विचारणा गोमंतकीय करताना दिसत आहे. ∙∙∙
भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानेही काही आदेश जारी केलेले आहेत. ते यथायोग्यच आहेत, पण त्यामुळे नगरपालिका-ग्रामपंचायती व शिक्षण संस्थांनीही आपण मुख्य काम सोडून भटक्या कुत्र्यांच्या मागे धावायचे काय? असे विचारणे सुरू केले आहे. स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या कार्यकक्षेत भटक्या कुत्र्यांमुळे नवनव्या समस्या उभ्या रहात आहेत, पण या संस्थांकडे त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ते साधनबल नाही, त्याची तरतूद न करता त्यांचा बंदोबस्त कसा करायचा? असा सवाल केला जात आहे. शिक्षण संस्थांचे सुध्दा तसेच आहे. शिक्षण संचालकांनी त्या संदर्भात वस्तुस्थितीपूर्ण अहवाल सादर करण्यास म्हणे सांगितले आहे. शाळा प्रमुख विविध अहवाल तयार करण्यात व्यग्र असतात, त्यातच हा एक नवा अहवाल त्यांना करावा लागणार असल्याने ते संतप्त झाले आहेत.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.