Goa Crime News: तारीवाडो-मंडूर येथे अलीकडेच एका अर्भकाचा पाय सापडल्याच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘बायलांचो एकवट’च्या आवदा व्हिएगस यांनी ही कदाचित भ्रूण हत्याही असू शकते. यामुळे पोलिसांनी या घटनेकडे क्षुल्लक घटना म्हणून न पाहता या प्रकाराचा गंभीरपणे तपास करावा, अशी मागणी केली आहे.
सुरवातीला आत्महत्येचे मानले जाणारे काब-द-राम प्रकरण दक्षिण गोवा पोलिसांच्या, विशेषत: डायगो ग्रासियस यांच्या नेतृत्वाखालील कुंकळ्ळी पोलिस दलाच्या परिश्रमपूर्वक तपासामुळे हत्या म्हणून निष्पन्न झाले, याकडे व्हिएगस यांनी लक्ष वेधले आहे. हाही प्रकार तसाच असू शकतो याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात व्हिएगस यांनी, अशा मुलांना टाकून देणाऱ्या घटना बहुतेकवेळा स्थलांतरित कामगारांशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. अशा घटनांवर नियंत्रण आणायचे असेल तर स्थलांतरितांची गंभीरपणे पडताळणी करण्याची गरज आहे.
मात्र, गोव्यात कायदेशीर सोपस्कार पूर्ण न करता खोल्या भाड्याने दिल्या जातात आणि कायदा मोडणाऱ्यांवर क्वचितच कारवाई केली जाते. काही वर्षांपूर्वी शिरदोन येथे एका अर्भकाचा मृतदेह सापडला होता; पण प्रकरण कधीही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही, याचीही आठवण करून दिली.
आवदा व्हिएगस, बायलांचो एकवट संघटना
आपली संघटना वेळोवेळी राज्य सरकारला रस्त्याच्या कडेला अर्भकांना सोडण्याच्या आणि फेकून देण्याच्या चिंताजनक प्रवृत्तीबद्दल सतर्क करत आली आहे. ही गंभीर बाब आहे. तपासात त्रुटी राहिल्या तर खुनासारखे आणखी क्रूर गुन्हे घडू शकतात. अर्भकाचा पाय सापडणे हे भ्रूणहत्येचे सूचक आहे आणि प्रकरण नेमके काय आहे, हे सिद्ध होईपर्यंत सर्वसमावेशक तपास करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.