Borim Bridge: बोरी पूल कमकुवत; दुर्घटनेचे संकट

New Borim Bridge: विरोध झुगारून सरकारने नव्या पुलाच्या कामाला चालना देणे आवश्‍यक आहे
New Borim Bridge: विरोध झुगारून सरकारने नव्या पुलाच्या कामाला चालना देणे आवश्‍यक आहे
Borim BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा बोरी येथील झुआरी नदीवरील पूल आता कमकुवत झाला आहे. सरकारने वेळीच पर्यायी व्यवस्था न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. विरोध झुगारून सरकारने नव्या पुलाच्या कामाला चालना देणे आवश्‍यक आहे.

दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा बोरी येथील झुआरी नदीवरील पूल आता ३८ वर्षाचा होत आला आहे. त्यावेळी फक्त तीन कोटी रू. खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. कोणत्याही पुलाचे आयुष्‍य हे ३० वर्षाचे असते.

परंतु हा पूल निकामी झाल्याने २०१९ साली सुमारे ११ कोटी खर्च करून या पुलाचे दुरुस्तीकाम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या पुलाच्या दुरुस्तीवर १० लाख खर्च करण्यात आले. आजवर दुरुस्तीवर जेवढा खर्च केला त्या पैशात नवा पूल यापूर्वीच उभा राहिला असता, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

येथे पर्यायी पूल बांधण्याचे सरकारचे प्रयत्न चालू असताना लोटलीच्या भागातील नागरिकांनी आपल्या शेतजमीन जोडरस्ता उभारण्यास विरोध केल्याने नव्या पुलाचे काम अडले आहे. परंतु सध्या या पुलावरून होणारी अवजड वाहतूक पाहता हा पूल किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सरकार बेसावध राहिल्यास हा पूल पणजीतील जुन्या मांडवी पुलासारखा निकामी होऊन जलसमाधी घेण्याची शक्यता अधिक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नवा पूल उभारण्यासाठी सर्व प्रकारचे विरोध झुगारून सरकारने पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

पोर्तुगीजकालीन जुन्या पुलाची धडगत नाही हे जाणून सरकारने या पुलाच्या काही अंतरावर सुमारे ३ कोटी रू. खर्चाची योजना आखून नवा पूल बांधला व २७ ऑगस्ट १९८६ रोजी लोकार्पण केले. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, मंत्री लुईसप्रोत बारबोझा, तत्कालीन आमदार सुभाष शिरोडकर आदींच्या उपस्थितीत या पुलाचे उद्‍घाटन झाले. तेव्हापासून गेली ३८ वर्षे या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. हा पूल आता पूर्ण जीर्ण झाला आहे, तरीही मोठ्या प्रमाणात वाहतूक या पुलावरून होत आहे. त्यामुळे हा पूल अधिक कमकुवत होत चालला आहे.

New Borim Bridge: विरोध झुगारून सरकारने नव्या पुलाच्या कामाला चालना देणे आवश्‍यक आहे
New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी खाजन जमीन खरेदी करावीच लागेल; मंत्री आलेक्स सिक्वेरा

लोटलीतील शेतात मातीचा भराव नको

नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लोटली परिसरातील नागरिक आपली खाजन शेती जाणार म्हणून या पुलाला विरोध दर्शवत आहेत. जोड रस्त्यासाठी शेतात मातीचा भराव न घालता खांब उभारून त्यावरून जोडरस्ता नेल्यास शेती वाचू शकते. सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

बोरीचा नवा पूल उभारणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. नवीन पूल उभारण्यास पाच ते सात वर्षाचा कालावधी लागतो. सध्या पुलाची स्थिती पाहता या पुलाला कोणत्याही वेळी धोका पोचू शकतो. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करणे आवश्‍यक आहे.

जयवंत आडपईकर, बोरी

सुमारे ३८ वर्षाचा हा बोरीचा पूल खुपच कमकुवत बनलेला आहे. या पुलावरून होणारी बेसुमार वाहतूक पाहता हा पूल कोणत्याही वेळी जलसमाधी घेण्याची शक्यता आहे. या जलमार्गावर नवा पूल उभारण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते होत नाहीत. हा पूल कोसळल्यास वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. याचा अनुभव अनेकदा जुना पूल निकामी झाल्यावर लोकांनी घेतलेला आहे. शासनाने नवीन पूल उभारण्यासाठी कंबर कसणे गरजेचे आहे.

विश्‍वंभर देवारी, बोरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com