Bori News : शिक्षकांना मध्‍यरात्री जुंपणार कामाला; रात्री साडेबाराला गाठावी लागणार बांबोळी

Bori News : विशेष म्‍हणजे मध्‍यरात्री १२.३० वाजता या शिक्षकांना कामावर उपस्‍थिती लावण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.
Bori
Bori Dainik Gomantak
Published on
Updated on

Bori News :

बोरी, शिक्षण खात्याने फतवा काढून राज्यातील सुमारे ६० माध्यमिक शिक्षकांना सैनिक भरती कामासाठी बांबोळी येथे सात दिवस जाण्याचे सूचित केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्‍यामुळे पालकांनी संताप व्‍यक्त केला आहे.

विशेष म्‍हणजे मध्‍यरात्री १२.३० वाजता या शिक्षकांना कामावर उपस्‍थिती लावण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी १९ जून रोजी याबाबतचे परिपत्रक शाळांना पाठविले आहे. सदर सैनिक भरती शिबिर २४ जूनपासून सुरू होत आहे. सैनिक भरती निवड प्रक्रियेत उमेदवारांचे दस्तावेज तपासणीच्या कामासाठी राज्यातील माध्यमिक विद्यालयांतील साहाय्यक शिक्षक, चित्रकला शिक्षक व शारीरिक शिक्षक अशा एकूण ६० शिक्षकांना पाठविण्‍याचे त्‍या-त्‍या संस्‍थेच्‍या मुख्याध्यापकांना सूचित करण्‍यात आले आहे.

शिक्षकांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर बरीच कामे विद्यालयात करावी लागतात. त्यातच इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांना या कामात गुंतवल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच शैक्षणिक नुकसान होणार आहे. सात दिवसांचा अभ्यासक्रम चुकणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षांचे नियोजन केलेले आहे.

दरम्‍यान, शिक्षणमंत्री या नात्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर काम देणार नाही अशी घोषणा केलेली आहे. परंतु तिची अंमलबजावणी होताना दिसत नाहीय.

वाहतुकीचीसुद्धा केली नाही सोय

भरपावसाळ्यात मध्यरात्रीच्या वेळी बांबोळी येथील सैनिक प्रशिक्षण कॅम्पवर जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही केलेली नाही. सर्वच शिक्षकांकडे वाहतुकीची साधनेही नाहीत. त्‍यामुळे दुरून येणाऱ्या शिक्षकांना मध्यरात्रीच्‍या वेळी भरपावसात बांबोळी गाठणे जोखमीचे ठरणार आहे.

मध्‍यरात्री १२.३० ते दुपारी १ पर्यंत काम

विशेष म्‍हणजे शिक्षकांना या कामासाठी मध्यरात्री १२.३० वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. मध्यरात्रीचे १२.३० ते सकाळी ६.३० पर्यंत आणि लगेच सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सलग १२ तास काम करायचे आहे.

एकूण सात दिवसांच्‍या कालावधीत एकेक दिवस सोडून असे कामाचे वेळापत्रक दिलेले आहे. मग शिक्षकांनी सलग काम करून झोप व आराम कधी करायचा? त्यातच काही शिक्षकांचे वय व अनारोग्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

मुकी बिचारी, कुणीही हाका! :

निवडणूक प्रक्रियेत शिक्षक आपल्या वाट्याला आलेली कामे मुकाट्याने करतात, म्हणून कुठल्याही शासकीय कामात शिक्षकांना वाटेल तसे राबवून घेणे योग्य नाही. शिक्षकांना आज मानसन्मान म्हणून राहिलाच नाही. शिक्षक अन्यायाविरोधात आवाज उठवत नाहीत याचा अर्थ शिक्षकांना मजुराप्रमाणे वागणूक देणे बरोबर नाही. हे असेच पुढे चालू राहिले तर शिक्षण क्षेत्र तळाला गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com