तुकाराम सावंत
डिचोली, लोकसभा निवडणूक एकदाची पार पडली. आता जनतेला काळजी आणि प्रतीक्षा आहे ती, प्रलंबित प्रश्न कधी सुटणार याची. निवडणूक आचारसंहितेमुळे काही ज्वलंत प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आहेत.
खास करून मुळगाव, शिरगाव, अडवलपाल आदी खाणपट्ट्यातील जनता लीज मुद्यावरून आपल्या मागणीशी ठाम आहे. खाण परिक्षेत्रातून मंदिरे आदी धार्मिक स्थळांसह घरेदारे आणि नैसर्गिक जलस्रोत बाहेर काढा, अशी मागणी मुळगावसह अन्य खाणपट्ट्यातील जनतेची आहे. लोकसभा निवडणूक झाल्याने आता तरी सरकार या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालेल, अशी जनतेची अपेक्षा आहे.
डिचोली मिनरल ब्लॉक-१ खाली येणाऱ्या ‘वेदान्ता’च्या खाण क्षेत्रात मुळगाव हा गाव येतो. मात्र खाण परिक्षेत्र मुद्यावरून हा गाव सुरूवातीपासूनच संघटित झाला आहे.
धार्मिकस्थळांसह घरेदारे आणि नैसर्गिक जलस्रोत खाण लीजमधून बाहेर काढा, अशी मुळगाववासीयांची सुरूवातीपासूनची मागणी आहे. ग्रामसभेतही वेळोवेळी या विषयावर गरमागरम चर्चाही झालेली आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनातही हा प्रश्न चर्चेला आला होता.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्रीपाद नाईक मुळगाव येथे आले होते. त्यावेळी लीजप्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात आला होता. त्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन मुळगाववासीयांना दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.