डिचोली तालुक्यातील कारापूर भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून या गव्यांनी परिसरात उच्छाद मांडला आहे.
गव्यांनी कारापूर येथील ''कोनगो'' परिसरातील मिरची आणि भाजीच्या मळ्यांत अक्षरशः धुमाकूळ घातला असू पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हतबल बनले आहेत.
दुसऱ्या बाजूने या गव्यांना हुसकावून लावण्यासाठी पुरुषांसह महिलाही शेत मळ्यांच्या ठिकाणी पहारा करीत आहेत. मात्र अद्याप गव्यांचा उपद्रव काही बंद झालेला नाही. गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करणारे निवेदनही वन खात्याला देण्यात आले आहे. गव्यामुळे शॆतकरी चिंतेत असून शासनाने त्वरित मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकरी चिंतेत
कारापूर येथील ''कोनगो'' परिसरात ५० हून अधिक शेतकऱ्यांनी मिरची, भाजीचे मळे फुलवले आहेत. मळ्यांनी लागवड केल्यापासून गव्यांचा उपद्रव सुरु आहे. मात्र आता मळे फुलल्यानंतर गव्यांचा धुमाकूळ वाढला आहे. मिरची आणि भाज्यांचे पिक हातातोंडाशी आले असतानाच, गव्यांचा उच्छाद वाढला आहे.
रात्रीच्यावेळी गवे काटेरी कुंपण मोडून मळ्यांनी घुसून ''पोरसू'' पिकाची नासधूस करतात, असे अशोक गावकर आदी शेतकऱ्यांनी सांगितले. गव्यांच्या धुमाकुळामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस होत असल्यामुळे शेतकरी पुरते गलितगात्र बनले आहेत.
मळ्यांनी फुलणारी भाजी बाजारात नेऊन त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून घरसंसार चालवण्यास मदत होत असते. मात्र गव्यांच्या धुमाकुळामुळे आता आमची मिळकत बंद झाली आहे, अशी कैफियत मिनिका कवळेकर आणि राधा सालेलकर यांनी मांडली.
आग पेटवून जागरण
वन खाते अपयशी ठरत असल्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता शेतकरीच पुढे सरसावले आहेत. पुरुषांसह महिला रात्री मळ्याजवळ जमून जागरण करीत आहेत. गव्यांना भिती दाखवण्यासाठी मळ्यांजवळ आग पेटवत आहेत.
पहाटेपर्यंत शेतकरी मळ्यांत थांबतात. गेल्या काही दिवसांपासून हा दिनक्रम चालू आहे. आग पेटवून गडबड केली, की गवे धूम ठोकतात, अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली. वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कारापूरमधील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.