Goa Accident : अपघातांचे कारण दारू नव्हे रस्ते

बारमालक संघटनेचा माविन गुदिन्हो यांच्या वक्तव्याला आक्षेप
goa accident
goa accidentDainik Gomantak

Goa Accident : दारू पिऊन तर्र होणाऱ्या ग्राहकांना घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित बारमालकाची असेल असा अध्यादेश काढणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली होती. यावर बार अँड रेस्टॉरंट ओनर असोसिएशनने आक्षेप नोंदवला असून अपघाताची कारणे ही दारू पिणे नसून राज्यातील रस्ते आहेत, असे म्हटले आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने गुदिन्हो यांचे वक्तव्य पोरकटपणाचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात अध्यादेश निघाल्यावर आम्ही त्याला विरोध करू, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील रस्ते अपघातामध्ये दारु प्यायल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण 30 टक्के आहे. यासाठी दारू पिऊन तर्र झालेल्या ग्राहकाला घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित बार आणि रेस्टॉरंट मालकाची असेल असा अध्यादेश लवकरच काढला जाईल, अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी वाहतूक सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिली होती. याची राज्यभर चर्चा असतानाच याला बार अँड रेस्टॉरंट ओनर असोसिएशनने आक्षेप घेतला आहे.

goa accident
Gomant Bal Rath : गोव्यात तब्बल 60 बालरथ ‘फिटनेस’विना रस्त्यावर

असोसिएशनचे अध्यक्ष मायकल कारास्को यांनी राज्यात होणाऱ्या रस्ते अपघाताला दारू पिण्याबरोबर खराब रस्तेही कारणीभूत असून रस्त्यांचे चुकीचे डिझाईन, नसलेले सिग्नल, दिशादर्शक फलक यांचा अभाव हेही असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाहतूक मंत्र्यांच्या वक्तव्याला आमचा आक्षेप असून प्रत्यक्षात ही कृती करणे शक्य नाही. कारण दारू पिलेल्या अवस्थेत ग्राहक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो. त्यामुळे भांडणे होण्याची शक्यताच जास्त आहे. बारमालक हे जबाबदारीने वागत असून अशा जास्त दारू पिणाऱ्या ग्राहकांना दारू न देता घरी जाण्याची विनंती केली जाते, असेही कारास्को यांनी म्हटले आहे.

वाहतूक मंत्र्यांचे वक्तव्य पोरकटपणाचे : आप

वाहतूक मंत्र्यांच्या वक्तव्याला आम आदमी पक्षानेही आक्षेप घेतला आहे. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी दारू पितात आणि दुसऱ्याच हॉटेलमध्ये जेवण घेतात. त्यामुळे तर्र होऊन गाड्या चालवणाऱ्या ग्राहकांना अडविण्याची जबाबदारी बारमालकांची नसून पोलिसांची आहे. पोलिस अधिक कार्यक्षम झाले, तर ही समस्या सुटू शकेल. मात्र, वाहतूकमंत्री अत्यंत पोरकटपणे वक्तव्य करत आहेत. या अगोदरच वाढवलेल्या करांमुळे हा व्यवसाय अडचणीत आहे, त्यात असा वेगळा अध्यादेश काढल्यास अडचणीत आणखी वाढ होणार आहे, अशी टीका पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com