Goa News: बहुजन समाजाचे अरण्यरुदन कादंबरीतून मांडणार! साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकरांचे आश्वासन

अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
P.S Sreedharan Pillai
P.S Sreedharan PillaiDainik Gomantak

म्हादई अभयारण्यात ३३ गावे येतात. आता व्याघ्र प्रकल्प होऊ घातला आहे. त्या गावांतील जनतेचा आवाज पारंपरिकरित्या हिरावून घेतलेला आहे. त्यांचे अरण्यरुदन कादंबरीतून मांडणार, असे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांनी आज राजभवनात जाहीर केले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी पर्येकर बोलत होते.

P.S Sreedharan Pillai
Utpal Parrikar: इलेक्शनच्या फंडिंगसाठीच ‘स्मार्ट सिटी’चे काम दुर्लक्षित

पर्येकर म्हणाले की, माझ्या कथेतील पात्रांना आवाज नाही. ते वर्षानुवर्षे दबलेले, पिचलेले आहेत. त्यांना कथेच्या माध्यमातून आवाज देण्याचा प्रयत्न केला. हा एक वेगळा गोवा आहे आणि त्याची माहिती अनेकांना नसेल. जगण्या-मरणाचा संघर्ष जनतेला दररोज करावा लागतो.

मोकासदारासमोर आवाज काढण्यास त्यांना परवानगी नसते. भटक्या विमुक्तांसारखे जीवन ते जगतात. त्यांच्या या व्यथांना साहित्यातून तरी स्थान दिले पाहिजे म्हणून मी लेखनाकडे वळलो. आजही अस्तित्वात असलेल्या जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला. म्हादई अभयारण्यातील आवाज नसलेल्यांना शब्दरूपी आवाज दिला. कथेतील पात्रे प्रत्यक्षात आयुष्यभर मौनातच असतात.

आपली व्यथा मांडण्यासही त्यांना मोकळीक नसते. त्यांचा आवाज होण्याचे काम माझ्या हातून घडले. आता गावांमध्ये शहरे घुसत आहेत. त्यातून आणखी गुंतागुंत वाढत आहे. तीही टिपली गेली पाहिजे.

सामाजिक जबाबदारी म्हणून म्हादईच्या २५ उपनद्यांच्या पात्रांची साफसफाई वर्षभरात करणार आहे. ७ रोजी त्याची सुरवात करणार आहे. म्हादई अभयारण्यातील लोकांचा संघर्ष, हा मोठा विषय असल्याने त्यावर कादंबरी लिहिणार आहे, असेही पर्येकर म्हणाले.

राज्यपाल म्हणाले की, पुढील दोन महिन्यांत २२ देशी भाषांतील पुस्तके प्रकाशित करण्याची योजना राजभवन राबवणार आहे. साहित्य समाजात संवेदनशीलता निर्माण करते. पूर्वीचे नेते लिहीत असत.

आज ती परंपरा खंडित झाल्यासारखी झाली आहे. समाजाच्या मनाची भूक साहित्याने भागवली पाहिजे, समाजमनावर प्रभाव टाकला पाहिजे, समाजाला दिशा दिली पाहिजे. साधी राहणी; पण उच्च विचारसरणी याचा अवलंब केला पाहिजे.

मावजो यांनी योग्यवेळी पर्येकर यांना पुरस्कार मिळाल्याचे निरीक्षण नोंदवले. लोकमान्यतेनंतर कलाकाराला राजमान्यताही लाभणे आवश्यक असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पर्येकर यांची लिखाणाची आवड त्यांना पूर्णत्वाकडे घेऊन जात आहे.

ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पर्येकरांचे लेखन अनुवादित झाल्याने त्यांची ओळख देशातील साहित्य जगताला होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

यावेळी मंचावर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, राजभवनचे सचिव एम.आर.एम. राव उपस्थित होते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com