
पणजी: ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५’चा समारोप मोठ्या उत्साहात झाला. मात्र, त्यानंतर महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी दुर्दशा समोर आली आहे. महोत्सव संपल्यानंतर कांपाल मैदानावर मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आणि घाणीमुळे दुर्गंधी पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
तिन्ही दिवस लाखोंच्या संख्येने लोकांनी महोत्सवाला हजेरी लावली; परंतु या गर्दीने मैदानाची स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरणीय सौंदर्य पूर्णतः नष्ट केले. महोत्सव संपल्यानंतर मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा झाला. पण यामुळे सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे महोत्सव नुसतेच ग्लॅमर दाखवतात; पण स्वच्छतेच्या आणि शिस्तीच्या पातळीवर पूर्णतः अपयशी ठरतात. सरकार मोठ्या महोत्सवांचे आयोजन करते; पण नंतर मैदानाचा आणि परिसराचा काहीही विचार करत नाही, अशी नाराजी एका स्थानिकाने व्यक्त केली. जर सरकार मोठ्या प्रमाणात असे कार्यक्रम आयोजित करत असेल, तर स्वच्छतेसाठीदेखील योग्य नियोजन आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्याने व्यक्त केले.
महोत्सव आयोजनासाठी सरकारकडून मोठा खर्च केला जातो; परंतु त्यानंतर स्वच्छतेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. स्थानिक प्रशासनाकडून मैदान स्वच्छतेसाठी तातडीचे प्रयत्न दिसून आले नाहीत.
मद्याच्या बाटल्यांचा कचरा नुसता सौंदर्यावर परिणाम करत नाही, तर तो पर्यावरणालाही हानी पोहोचवतो.
सरकारकडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अशा हलगर्जीपणामुळे भविष्यात महोत्सवांचे आयोजन करताना पर्यावरणीय आणि स्वच्छतेचे प्रश्न गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिक विरोध करू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.