पणजी, करदात्यांचे पैसे गटारात टाकणे, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘विकसित भारत’ आहे का, याचे उत्तर भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक गोमंतकीयांना देतील का? अशाप्रकारे सार्वजनिक निधी गटारात टाकणे योग्य आहे का? असा सवाल काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केला आहे.
ॲड. खलप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगोल्डा येथील मलनिस्सारण वाहिनीसाठी निर्माण केलेल्या चेंबरच्या टाकीच्या एका बाजूने जाणाऱ्या पाण्याच्या वाहिनीचाही या बांधकामात कशापद्धीने समावेश करून घेण्यात आला आहे याचे छायाचित्र जोडलेले आहे.
त्यावरूनच ॲड. खलप यांनी भाजप सरकारच्या कामावरून प्रतिस्पर्धी उमेदवार नाईक यांना सवाल केला आहे. पणजी स्मार्ट सिटीत गोंधळ झाल्यानंतर आता सांगोल्डा येथे बेजबाबदारपणाने काम केले जात आहे. ‘२००४ ची इंडिया शायनिंग’ विसरू नका, असाही उपरोधिक टोला त्यांनी नाईक यांना लगावला आहे.
‘भाजप सरकारच्या सर्व प्रकल्पांत भ्रष्टाचार’
भाजप सरकारच्या प्रकल्पांना अवघ्या सहा महिन्यांत तडे जातात, छप्पर कोसळतात, जमिनीवरील फरशा उखडतात. भाजपच्या प्रकल्पांना गॅरंटी नाही आणि वॉरंटीही नाही.
नवीन पाटो पूल, अटल सेतू, पणजी स्मार्ट सिटी, कला अकादमी नूतनीकरण, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, न्यू जुआरी पूल, शेकडो बळी घेणारा पत्रादेवी ते पर्वरी महामार्ग, लुसोफोनिया आणि नॅशनल गेम्ससाठी बांधलेले स्टेडियम हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराची ज्वलंत उदाहरणे असल्याचा आरोप त्यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.