

पणजी: वाढीव वीजबिले, वारंवार होणारे वीज खंडित होणे आणि स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेच्या वतीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून त्या ३१ जुलैपर्यंत त्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी प्रत्येक घराला दरमहा ३०० युनिट मोफत वीज द्यावी, १५ जूनपर्यंतची सर्व वाढीव वीजबिले व दंड माफ करावेत आणि स्मार्ट मीटर योजना तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली. यावेळी गोवा प्रभारी आतिषी मार्लेना, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आणि संदेश तेलेकर उपस्थित होते.
दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव बिले येत असून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जनतेला स्मार्ट मीटर नव्हे तर स्मार्ट वीजपुरवठा हवा आहे, असे सांगत केजरीवाल यांनी स्मार्ट मीटर योजनेला ‘घोटाळा’ असे म्हटले.
३०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि थकित बिले माफ केल्यास राज्यातील सुमारे ७६ टक्के ग्राहकांची वीजबिले शून्यावर येतील, असा दावा केजरीवाल यांनी केला. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने अशाचप्रकारे मोफत वीज व थकित वीज बिल माफीची अंमलबजावणी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोव्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिक त्रस्त आहेत. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत सुमारे १९ हजार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा दावा करत केजरीवाल यांनी सरकारवर टीका केली. सुरळीत वीज देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला वाढीव बिले आणि स्मार्ट मीटर जनतेवर लादण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.