यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने राजधानीत पुन्हा पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी कबुली पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीची कामे ९० टक्के झाल्याचा दावाही त्यांनी केला.
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या मुदतीला एक दिवस बाकी उरला आहे. ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला आणि सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांसह मळा ते काकुलो जंक्शन पाहणी केली.
पणजीकरांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्यांचे राहणीमान उंचावे यासाठी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, परंतु ही कामे दिलेल्या मुदतीनुसार ३१ मे पर्यंत पूर्ण होणार का? हा सवाल होता आणि त्याचे उत्तर मंत्री बाबूश यांनी देऊनही टाकले.
स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यानंतर जी कामे झालेली आहेत, त्यातून पणजीत पावसाळ्यात पाणी तुंबणार काय? अशीच शंका सर्वांना सतावत आहे. त्यावरही बाबूश यांनी शक्यता नाकारली नसल्याने पणजीकरांनी तुंबणाऱ्या पाण्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे, असेच एकप्रकारे सूचित केले आहे.
आमदार म्हणून मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करून ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचे आणि काही ठिकाणी मॅनहोलचे, तर पदपथांचे काम बाकी राहिल्याचे सांगितले. त्याशिवाय कामाच्या दर्जाबाबत मात्र त्यांनी कंत्राटदारावर ठपका ठेवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.