
सर्वेश बोरकर
मराठा आणि इंग्रज सैन्यासोबत युद्ध चालू ठेवण्यासाठी तसेच जास्त महसूल गोळा करण्यासाठी आणि मंदिरांमध्ये लपवलेल्या मोठ्या खजिन्याचा शोध सुरू ठेवण्यासाठी, म्हैसूरचा हैदर अलीचा उत्तराधिकारी टिपू सुलताने म्हैसूर आणि दख्खनमध्ये जास्त लक्ष केंद्रित कण्याचा निर्णय घेतला, अधिक शक्तिशाली विरोधक असूनही तो युद्धे करत राहिला.
पण जेव्हा त्याला परिस्थिती चांगली दिसत नसल्याची खात्री झाली तेव्हाच टिपूने इस्तंबूल किंवा आजचे तुर्की येथील शक्तिशाली ऑट्टोमन सुलतान अब्दुल हमीदचा पाठिंबा घेण्याचे ठरविले. युद्धे लढण्यासाठी आणि मराठ्यांना पैसे देण्यासाठी त्याला खूप पैशांची आवश्यकता होती आणि त्रावणकोर संस्थानकडे तो आहे, हे तो जाणून होता.
त्याची पुढील योजना त्रावणकोर संस्थान लुटायचे व छापा टाकण्याची होती. जिथे त्याला वाटले होते की पळून जाणाऱ्या विजयनगर व मलबार राजपुत्रांनी त्यांचे खजिना लपवले आहेत. पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करून टिपू सुलतानने तुर्कीच्या ऑट्टोमन सुलतानला आपल्या बाजूने आकर्षित करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले होते.
१७७०च्या दशकाच्या उत्तरार्धातही म्हैसूरचा हैदर अली मोठ्या नेत्यांच्या यादीत नव्हता आणि त्याचा उल्लेख फक्त म्हैसूर राजाला साह्य करणारा जमीनदार म्हणून केला जात असे. हैदर अलीच्या निधनानंतरही, दख्खनचा निजाम त्याचा उल्लेख फक्त त्याचा ‘दिवंगत’ नोकर म्हणून करत असे. पण हैदर अलीचा उत्तराधिकारी असलेल्या टिपूकडे तोपर्यंत केवळ मोठी शक्तीच नव्हे तर मोठे राज्यदेखील होते.
टिपूने म्हैसूरच्या राजाला बेकायदेशीरपणे पदच्युत करून सत्ता हस्तगत केली होती. पण अजूनही दख्खनच्या निजामाकडून त्याला कायदेशीर पदव्या नसलेला, राज्य हडप करणारा मानला जात असे आणि त्याला ‘निजाम’ आणि ‘नवाब’ या पदवींपेक्षा खूपच खाली स्थान देण्यात आले होते. अशाप्रकारे टिपूला जग नवाब किंवा सुलतान म्हणून नाही तर फक्त फतह अली खान म्हणून ओळखत असे आणि त्यामुळे टिपू त्याचे पद कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत होता.
फ्रेंच प्रभावाचा वापर करून दिल्लीतील मुघल प्रशासनाकडे वारंवार चर्चा करून त्याने आर्कोटच्या नवाबाची पदवी त्याच्याकडे हस्तांतरित करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते करण्यास टिपू यशस्वी झाला नाही. कारण ब्रिटिशांचा म्हणजे मेजर ब्राउनचा दिल्लीतील मुघलांवर जास्त प्रभाव होता. अशा प्रकारे, स्वतंत्र नवाब होण्याची इच्छा टिपूसाठी निराशाजनक वाटत होती. शेवटी त्याने त्याचे स्वातंत्र्य घोषित करण्याचा निर्णय घेतला. परंतु ते वैध होण्यासाठी त्याला उच्च मान्यता मिळवावी लागणार होती.
त्यासाठी त्याने इराणचा शासक करीम खान आणि अफगाणिस्तानचा शासक जमान शाह यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्याही पुढे जाऊन त्याने इस्तंबूल येथील म्हणजे आजचे तुर्की येथील शक्तिशाली ऑट्टोमन सुलतान अब्दुल हमीदचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला व त्या लोकांशी संपर्क साधला. टिपूने प्रत्यक्षात एक बहुआयामी मोहीम राबवली, जिथे तो केवळ अफगाण, पर्शियन आणि ओटोमनच नव्हे तर फ्रेंच आणि शक्य असल्यास इंग्रजांकडूनही मान्यता मिळवेल.
१७८६मध्ये एका मोठ्या दूतावासाच्या प्रस्थानासाठी चौकशी मोहिमेनंतर, टिपूने मोठ्या दूतावासाची नियुक्ती केली. त्याचा उद्देश ऑट्टोमन साम्राज्यात कारखाने स्थापन करण्यासाठी फर्मान मिळवणे हा होता, जेणेकरून त्याचे उत्पादन विकता येईल व त्या बदल्यात तो त्यांना मलबार पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच मंगलोरला बंदरे देणार होता.
दुसरा उद्देश टिपूला स्वतःची मान्यता किंवा पदवीची पुष्टी मिळवणे आणि तिसरे म्हणजे इंग्रजांशी लढण्यासाठी लष्करी पाठिंबा मिळवणे. याव्यतिरिक्त, दूतावासाचे नेतृत्व ओमानच्या अमीरशी संबंध मजबूत करणे व पर्शियाच्या शाहकडून सवलती मिळवणे हेसुद्धा होते. नोव्हेंबर १७८५मध्ये टिपूच्या राजदूतांनी श्रीरंगपट्टनम सोडले, त्यानंतर मार्च १७८६मध्ये वारा अनुकूल झाल्यानंतर मंगलोरच्या बंदरातून चार जहाजांमधून प्रवास केला, ज्यांत एकूण ९०० लोक होते.
जहाजावर मोठ्या संख्येने भेटवस्तू होत्या, भरपूर व्यापारी साहित्य होते, तसेच चार हत्तीदेखील होते. खूप वादळी प्रवास आणि एका हत्तीच्या मृत्यूनंतर, जहाजे सुमारे एक महिन्यानंतर ओट्टोमानच्या मस्कत बंदरामध्ये पोहोचली. परिस्थिती आधीच चांगली नव्हती आणि काही लोक घाबरून मुंबईला परतणाऱ्या इतर मालवाहू जहाजांवर पळून गेले.
काही उत्पादन विकल्यानंतर आणि इतर बेटांना भेट दिल्यानंतर, ते ऑगस्टमध्ये इराकमध्ये बसरा येथे पोहोचले. पण त्यांनी चार जहाजांपैकी एक आणि अनेक माणसे गमावली होती. पुढे आणखी दोन हत्ती मरण पावले आणि ऑट्टोमन सुलतानसाठी जवळजवळ सर्व भेटवस्तू हरवल्या गेल्या होत्या. फेब्रुवारी १७८७मध्ये, सुमारे २०० शिपायांसह व ४०० माणसांचा एक गट इराकमधील बसराहून बगदादमार्गे इस्तंबूलला निघाला व सप्टेंबर १७८७मध्ये तेथे पोहोचला. यावेळी उष्णतेमुळे मृत्युमुखी पडलेले सर्व हत्ती आणि जवळजवळ कोणतीही मोठी भेटवस्तू (सोने आणि लाकडी व्यासपीठ आणि दोन पक्षी वगळता) त्यांच्याकडे शिल्लक नव्हती.
एका महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये टिपूच्या राजदूतांनी तुर्की येथील शक्तिशाली ऑट्टोमन सुलतान अब्दुल हमीदची भेट घेतली. सुलतानला पटवून देण्यासाठी, टिपूच्या राजदूतांनी असा युक्तिवाद केला की सुमारे १०,००० मुस्लीम मुलांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्यात आले होते आणि अनेक मशिदी आणि दफनभूमी नष्ट करून चर्चमध्ये रूपांतरित करण्यात आल्या होत्या.
हे आणि त्याची धार्मिक जबाबदारी लक्षात घेता, त्याने जिहादचा पर्याय निवडला व मंगलोरच्या ख्रिश्चनांवर अनेक विजय मिळवले आहेत, असे तो म्हणाला. पण टिपूचे दुर्दैव टिपूला शासकाची पदवी धारण करण्याची, नाणी काढण्याची आणि त्याच्या नावाने खुत्बा म्हणण्याची परवानगी मिळालेली असूनसुद्धा तुर्कांना त्यांच्या स्वतःच्या अडचणींमुळे भौतिक मदत, लष्करी मदत किंवा कोणतेही व्यापार परवाने देता आले नाहीत.
टिपू सुलतानने तुर्कस्तानला एवढी मोठी मोहीम पाठवली याचा परिणाम इंग्रजांवर जो व्हायचा तोच झाला. इंग्रज त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले. टिपू सुलतानने अनेक युद्धे जिंकली, या सर्वांचा उलट परिणाम म्हणजे इंग्रजांनी टिपूचे घरगुती प्रतिस्पर्धी हैदराबादचे निजाम आणि आर्कोटचे नवाब यांना पाठिंबा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.