
विकास कुलकर्णी
बांबूपासून कणग विणण्याबरोबरच पावसाळ्यात शेतीच्या कामांसाठी लागणारे हारे, टोपल्या, बैलांची टोपरी बांबूपासून बनविली जायची. नांगर जुंपण्यासाठी लागणारे नांगर, दोरी, रुमणी, इशाड, जगाल, फावडे, कुदळ, टोपरे यांसारख्या वस्तूंची व अवजारांची दुरुस्ती पावसाळ्याआधी करून घेणे हा देखील बेगमीचा एक भाग होता.
पूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे करताना पुरुष घोंगडी तर स्रिया इरली वापरीत. बांबूच्या भेतांपासून आणि पळसाच्या पानांपासून अशी आखीव रेखीव इरली बनविली जात. पावसाळ्याआधी या सर्व वास्तूसाठी गावांतील पंचक्रोशीच्या एखाद्या ठिकाणी असे इरली, घोंगड्यांचे बाजार भरत असत.
पावसाळ्यात पावसात काम करताना थंडी, वारा, गारठ्यापासून संरक्षण होण्यासाठी उबदार व लोकरी घोंगडीचा चांगला उपयोग होत असे. याशिवाय थंडी वाऱ्यात व पावसात काम करताना शेतात काम करणाऱ्या स्रियांसाठी इरली फार उपयोगी ठरत. एकदा विकत घेतलेली इरली, घोंगडी पुढची चार पाच वर्षे वापरण्यासाठी योग्य असे. काही इरली आणि घोंगड्या अगदी दहा दहा वर्षेही टिकत असत. पावसाळ्यापूर्वीच अशा वस्तूंची तजवीज करणे, दुरुस्ती करणे हाही पुरुमेंताचाच एक भाग होता.
गोवा-कोकणातील शेतकरी प्राचीन काळापासून निसर्गपूजक आहे. येथील प्रत्येक शेतकऱ्याचे निसर्गाशी अतूट नाते असून विविध सणांच्या माध्यमातून तो निसर्गाची यथाशक्ती व यथोचित पूजाअर्चा फार मोठ्या श्रद्धेने करत आला आहे.
पावसाळ्यात शेतीस सुरुवात होताना शेतीच्या हंगामात कोणतीही आपत्ती ओढवू नये, गुराढोरांना कोणतीही इजा होऊ नये, सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये आणि जंगली जनावरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतात चांगले व भरपूर धान्य पिकावे यासाठी आपल्या शेतातील पारंपारिक स्थळांवर निसर्ग देवतेची ‘देणी‘ देण्याची व अशा स्थानिक दैवतांस, भूताखेतांस तृप्त करण्याची पूर्वापार प्रथा हादेखील एक भाग होता.
या निमित्ताने एखाद्या स्थानिक सोवळ्या देवास शाकाहारी नैवेद्य दाखवून तर मांसाहारी देवास गावठी कोंबड्याची ‘राखण‘ देऊन अशा निसर्ग दैवतांस तृप्त करण्याचा प्रयत्न व्हायचा. अशा स्थानिक देवता तृप्त व समाधानी झाल्यावर आपली वर्षभरातली शेतीची कामे निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची नितांत श्रद्धा येथील शेतकऱ्याच्या मनात होती.
एकदा मृगाचा पाऊस सुरु झाल्यावर येथील शेतकऱ्यास क्षणाचीही उसंत मिळत नसल्याने या राखणीच्या निमित्ताने घरातील संपूर्ण कुटुंब, मुंबईत जाणारे चाकरमानी अशा सर्वांनाच या निमित्ताने कधी मिष्टान्न तर कधी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेता येत असे. वर्षातून अशाच प्रसंगांत केवळ एक दोनदा घरात पाळलेली गावठी कोंबडी कापून कधीतरी अशी सुग्रास मेजवानी करण्याचे प्रसंग येत.
अशा एक दोन प्रसंगांत चमचमीत मांसाहाराचा आस्वाद घेऊन येथील शेतकरी सुखी व समाधानी दिसे. याशिवाय आपल्या परिसरातील देवाचे ‘देणे‘ देऊन त्याला तृप्त केल्याचे समाधानही येथील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. येथील काही ठिकाणी अनेक माहेरवाशिणीही त्यांच्या मुलाबाळांच्या रखवालीसाठी माहेरच्या अशा काही दैवतांची ‘राखण‘ घेत. माहेरची, माहेरच्या दैवतांविषयीची ओढ या निमित्ताने वृद्धिंगत होत असे आणि दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंध या निमित्ताने अधिक दृढ होण्यास मदत असे. तर अशी राखण घेणे हा देखील पुरुमेंताचा एक भाग असेल काय?
पावसाळ्यासाठीची तरतूद, पावसाळ्यासाठीचे नियोजन आणि ऐन पावसाळ्यात पाऊस, पूर आदी नैसर्गिक आपत्तीकाळात गडबड होऊ नये, घरात रोजच्या वापरासाठीच्या जिन्नसांची वानवा होऊ नये यासाठी येथील पूर्वजांनी केलेली ‘पुरुमेंता’ची प्रथा हे आर्थिक व कौटुंबिक नियोजनाचे एक आदर्श उदाहरण होते. अजूनही इतक्या सर्व सुधारणा होऊन किंवा आता सर्व पदार्थांची वर्षभर उपलब्धता असूनही प्रत्येक जण दरवर्षीच्या अशा पुरुमेंताच्या फेस्ताची किंवा अशा बाजाराची आतुरतेने वाट पाहत असतात. शेवटी जुने ते सोने, खणखणीत नाणे हेच खरे म्हणायचे. बाकी सर्वच आभासी जग आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.