
पणजी: गर्दी काही समस्यांवर वरवरचा उपाय करून भागत नाही. कारणाचे मूळ शोधून त्यावर इलाज झाल्यास निराकरण शक्य होते. माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यूनंतर ‘रोडरेज’च्या वाढत्या प्रकारांविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
‘रोडरेज’चा अर्थ वाहनचालकांच्या हिंसक, धोकादायक आणि आक्रमक वर्तनाशी निगडित आहे. दोन वाहनांच्या अनपेक्षित संपर्कातून निर्माण होणाऱ्या वादाच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. क्षुल्लक कारणांवरून संघर्ष विकोपाला जातो व त्याचे पर्यवसान जीवघेण्या परिणामांत होते.
गोव्यात अशा घटना वरचेवर होत आहेत. ही समस्या देशपातळीवर भेडसावत आहे. अनेकदा वाहतूक सुरक्षा कर्मचारीदेखील स्वतः ‘रोडरेज’चे बळी ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी बाणस्तारी पुलावर वाहतूक शिस्त मोडल्याची जाणीव करून देणाऱ्या पोलिस साहाय्यक उपनिरीक्षकाला, दलात नव्याने दाखल झालेल्या शिपायाने मारहाण केली होती.
हल्लीच चोगम रोडवर नाशकातील दोघा पर्यटकांनी टॅक्सी चालकाला बेदम झोडपले, ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. देशात अशा वर्षभरात एक लाख ऐेंशी हजाराहून अधिक घटना घडतात. मिसरूड न फुटलेली मुलेही वाहने बेशिस्तपणे हाकतात आणि कुणी हटकल्यास त्यांचे हावभाव अत्यंत भीतीदायक असतात. अलीकडे सर्रास असा अनुभव येतो. शिवीगाळ, धमकी, असभ्य इशाऱ्यांमुळे भावनांवरील ताबा सुटतो आणि दोन व्यक्ती, गटांत संघर्ष उभा राहतो.
पार्क केलेली जिप्सी काढण्यास सांगितल्याने राग आलेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने प्रौढाला इतकी बेदम मारहाण केली की त्याला मृत्यू आला, सिद्धूला त्यासाठी कारावास भोगावा लागला. १९८८सालातील एक प्रकरण ‘रोडरेज’चे परिणाम दर्शविण्यास पुरेसे आहे. अवघ्या काही क्षणांत येणाऱ्या रागाचे क्रोधात होणारे रूपांतर दोन्ही घटकांसाठी हानिकारकच ठरते. म्हणूनच ‘रोडरेज’ला सार्वजनिक सुरक्षेसाठी कलंक मानले गेले आहे. अशा घटना कशा टाळल्या जातील, यावर विचार साकल्याने विचार करण्याची गरज दिसते.
‘रोडरेज’मध्ये भावनांवरील हरवणारे नियंत्रण गंभीर परिणामांना कारण ठरत आले आहे. त्यासाठी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या मुद्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. ज्याचा समावेश शैक्षणिक स्तरावर व्हायला हवा; दुर्दैवाने त्याकडे सरकारला लक्ष द्यावेसे वाटलेले नाही. आपल्या भावना सुदृढ आहेत की अशक्त याची ओळख करण्याचे कौशल्य बालवयापासून अंगी बाणवले गेल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतील.
मानसोपचाराच्या परिभाषेनुसार भावना हाताळण्याचे तंत्र शिकवावे लागते, ते आपोआप येत नाही. भावना हे वागणुकीचे इंधन आहे. त्या मर्यादेपलीकडे जात असल्यास धोक्याची घंटा ठरते. स्वत:च्या भावना ओळखणे, त्या हाताळणे व समोरील व्यक्तीची मनोवस्था ओळखून त्याला योग्य प्रतिसाद देण्याचे सूत्र व्यावहारिक जीवनात अंगीकारणे गरजेचे बनले आहे.
राग ही भावना नैसर्गिक आहे. परंतु त्यावर क्रोधीत होऊन व्यक्त होण्याचा पर्याय योग्य नव्हे. ‘डिसअपॉयमेन्ट’ जेव्हा ‘डिझास्टर’ मानले जाते तेव्हा आत्मघात संभवतो. डिजिटल युगात रियॅलिटी शो असतील वा क्रिकेटची मॅच. तेथे भडक भावनांना विकृत पद्धतीने विकले जाते. ‘बिगबॉस’सारखे कार्यक्रम विकृतीचे उदात्तीकरण आहे.
‘रोडरेज’च्या निमित्ताने आणि धकाधकीच्या जीवनात वाढणाऱ्या उच्च रक्तदाबासारख्या विकारांना सामोरे जाताना भावना नियंत्रणाचे तंत्र विकसित करावे लागेल. त्याचा शालेय पातळीवर अंतर्भाव अपरिहार्य आहे. ‘रोडरेज’सारख्या घटनांमध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत, यावरही वाहतूक खात्याने जागृती करावी. एखाद्या कामासाठी बाहेर जाताना किरकोळ अपघातासारख्या घटना घडतात तेव्हा समयसूचकता दाखवून शांत व मुत्सद्दी राहणे श्रेयस्कर. जो चुकत असेल त्याला शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना आहे, आपल्याला नाही, याचा विसर न व्हावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.