
पर्यटन क्षेत्रात घुसलेली गुंडगिरीच दिसून येते. त्यामागील कारण बहुतेक शॅक जरी स्थानिकांना दिले जात असले तरी नंतर ते कितीतरी पट अधिक रक्कम उकळून परप्रांतीयांना चालवायला दिले जातात व त्यातून हे प्रकार घडतात.
ऐशींच्या दशकात गोव्यातील (Goa) पर्यटन क्षेत्राला जागतिक प्रसिद्धी मिळाली ती स्व. इंदिराजींनी या चिमुकल्या प्रदेशाची चोगम रिट्रीटसाठी निवड केल्याने. चोगमसाठी देशात आलेले जागतिक नेते विश्रांतीसाठी गोव्यात आले व त्यामुळे साऱ्या जगभरातील नजरा येथील सृष्टिसौंदर्याकडे वळल्या व त्यातूनच गोवा जागतिक पर्यटन केंद्र बनले. चोगमसाठी केवळ ताज व्हिलेजच उभे झाले नाही तर दक्षिण व उत्तर गोव्यात अनेक तारांकित हॉटेल उभी राहण्याचे पर्व सुरू झाले, अनेक जागतिक बैठका व परिषदा गोव्यात सुरू झाल्या. त्यामुळे पर्यटनाशी निगडीत अनेक व्यवसाय व उपव्यवसाय सुरू झाले, टॅक्सी व अन्य संबंधित व्यवसायांना बळकटी आली. त्यानंतर म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षांत किनारपट्टीवर शॅक व कॅसिनोंना सुरुवात झाली. हे दोन्ही प्रकार नेमके कोणी आणले व त्यांना कोणी राजाश्रय दिला ते महत्त्वाचे नाही. या दोन्हीमुळे सरकारी तिजोरी भरते किंबहुना त्यांच्यातून येणाऱ्या महसुलावरच राज्याचा डोलारा आज अवलंबून आहे हे खरे असले तरी गोव्याचे जनजीवन व संस्कृती मात्र त्यांमुळे उद्ध्वस्त होत चालली आहे हे वास्तव आहे.
गोव्यात आज भाजप (BJP) सरकार सत्तेवर आहे, पण भारतीय संस्कृती व परंपरेचे रक्षण करण्याच्या घोषणा करणाऱ्या या सरकारच्या नेत्यांना गोव्यातील या अनिष्ट गोष्टींचे काहीच पडून गेलेले दिसत नाही. त्यामुळे देशभरच नव्हे तर जगभर गोव्याची नाचक्की होत आहे. पर्यटकांची संख्या घटण्याचे तेच तर कारण नाही ना, याचा अभ्यास होण्याची गरज आहे.
नववर्षाच्या उत्तरार्धांत उत्तर गोव्यात हरमल येथे एका शॅक कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीत एका स्थानिकाला आलेला मृत्यू असो वा त्यापूर्वी कळंगुट येथे अशाच प्रकारे स्थानिकांना झालेली अमानुष मारहाण असो, त्यातून त्या क्षेत्रांत घुसलेली गुंडगिरीच दिसून येते. त्यामागील कारण बहुतेक शॅक जरी स्थानिकांना दिले जात असले तरी नंतर ते कितीतरी पट अधिक रक्कम उकळून परप्रांतीयांना चालवायला दिले जातात व त्यातून हे प्रकार घडतात. कायद्याने शॅक दुसऱ्याला चालवायला देता येत नाहीत पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते कारण किडलेली यंत्रणा. अन्यथा शॅक सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी संबंधित खात्याने एकदाही तपासणी कशी केली नाही. फार दूर कशाला, अशा शॅकमधून योग्य प्रकारचे जेवण वा खाद्यपदार्थ पुरविले जातात ना याची शहानिशा एफडीएने केली आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो. बहुतेकदा कोणती तरी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा कामाला लागतात हे ताज्या प्रकरणातून सिद्ध झाले आहे.
फार दूर कशाला हरमलमधील त्या घटनेनंतर शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूज कार्दोज यांनीच गोव्यातील ४० ते ४५ टक्के शॅक अशा प्रकारे परप्रांतीयांना चालवायला दिले गेलेले आहेत व त्यासाठी यादीही सादर करण्याची आपली तयारी असल्याचे सांगून संबंधित यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पण ही झाली एक बाजू. नियम अशा प्रकारे खुंटीवर टांगणाऱ्यांवर सदर संघटना कोणती कारवाई करणार असा प्रश्नही उपस्थित होतो. आपली मानसिकता अशी की सर्व काही सरकारने करावयाचे आपण स्वस्थ बसणार त्यामुळेच खरे तर असे प्रकार वाढू लागले आहेत. एरवी परप्रांतीयांच्या नावे कोकलणाऱ्यांनी ही बाब खरे तर गंभीरपणे घ्यायला हवी. शॅकमधून कर्णकर्कश आवाजात वाजणारे संगीत, भरती क्षेत्रांत टाकल्या जाणाऱ्या खुर्च्या व खाटा यांचेही तसेच आहे, पण त्याचे कोणालाच काही पडून गेलेले नाही.
केवळ शॅकच नव्हे तर अन्य अनेक उपक्रमांचेही तसेच आहे. टॅक्सी असो वा रिक्षा किंवा पर्यटक बसेस, या सर्व क्षेत्रांत परप्रांतीयच शिरजोर बनत चालले आहेत. कारण आपणा कोणाचीच श्रम करण्याची तयारी नाही. तरी जे कोणी ते करतात त्यांना वेड्यात काढण्यात आपण धन्यता मानतो. केवळ कोलवा, दोनापावला, कळंगुटच नव्हे तर पाळोळे-गालजीबागसारख्या ठिकाणी दाटीवाटीने उभी झालेली ९० टक्के दुकाने ही परप्रांतीयांची आहेत.
मागे काश्मीर भेटीत एक कोणी तरी खान भेटला व गप्पांत त्याने आम्ही गोव्याचे म्हटल्यावर आपला कोलव्यात व्यवसाय(दुकान) चालतो असे सांगितले. मजेची बाब म्हणजे हिमवृष्टीमुळे काश्मिरात पर्यटक नसतात तेव्हा तो गोव्यात येऊन व्यवसाय करतो व तेथील पर्यटक मोसमात तिकडे जातो. आम्ही मात्र सरकारी नोकरीची प्रतीक्षा करतो. गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र विकसीत झालेले असतानाही त्यात गोमंतकीय न दिसण्याचे व पर्यटनस्थळांत आता ज्या अनिष्ट घटना घडू लागल्या आहेत त्याचेही हेच तर कारण नसावे ना अशी शंकाही त्यामुळे वाटू लागते.
आता मोपा विमानतळ सुरू झाला आहे. त्यामुळे केवळ गोव्याच्याच नव्हे तर शेजारच्या महाराष्ट्रातील पर्यटनाला चार चांद लागल्याचे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात काय वास्तव आहे याचा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा गंगा दारात आली तरी तिचा लाभ मात्र भलत्यांनीच घ्यायचा असे होईल. कारण यापूर्वी कोकण रेल्वेबाबत तेच झाले होते. ते पर्यटनाबाबत होऊ नये याची खबरदारी सरकारने व गोमंतकीयांनीही घेण्याची गरज आहे. आता तर पर्यटन खात्याने प्रमुख देवालयांना पर्यटन सहलींत अंतर्भूत केले आहे. तसेच केवळ समुद्रकिनारे म्हणजे पर्यटन नव्हे तर अंतर्गत भागांतील सौंदर्याचा परिचय घडविण्याची योजनाही आखली आहे. त्या सर्व योजना यशस्वी होण्यासाठी पर्यटन क्षेत्रांत शिस्त गरजेची आहे व तिची कठोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटेकडे ती धमक आहे. तिचा उपयोग करून काळवंडलेले पर्यटन क्षेत्र उजळ करण्याचीच आज खरी गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.