

देवाच्या वेषात आलेल्या या दानवांना ओळखणे, त्यांची माहिती ठेवणे व त्यानुसार कसलीच दयामाया न दाखवता निष्ठूरपणे कारवाई करणे हा आदरातिथ्याचाच भाग म्हणून गोव्याला स्वीकारावे लागेल.
आईच्या मायेने आदरातिथ्य करणाऱ्या गोव्याच्या वाट्याला सध्या चोर-दरोडेखोरांच्या हातून लुटून घेणे आले आहे. येणाऱ्या अतिथीस आपण देव मानले जाते, तिथे देवासारखे वागावे असे वाटत नाही. देवाच्या वेषात आलेल्या या दानवांना ओळखणे, त्यांची माहिती ठेवणे व त्यानुसार कसलीच दयामाया न दाखवता निष्ठूरपणे कारवाई करणे हा आदरातिथ्याचाच भाग म्हणून गोव्याला स्वीकारावे लागेल. अतिथी व आततायी यातील फरक हुडकणे अत्यावश्यक आहे.
आपल्या शांत गोव्यात सध्या अनेक दरोडे घातले जात आहेत. या दरोड्यांमध्ये बहुतेक वेळा गोव्याबाहेरचे लोक सहभागी असतात आणि त्यांना काही प्रमाणात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या स्थानिकांचीही मदत मिळतेे. कुणावर बोट ठेवण्याचा हेतू नाही, पण आहे ती वस्तुस्थिती आहे.
म्हणूनच गोव्यात येणारे आणि गोव्यातून जाणारे-गोमंतकीय असोत वा बाहेरचे-सर्व लोकांची नोंद आधार कार्डाद्वारे डिजिटल पद्धतीने ठेवली पाहिजे. आज जवळपास प्रत्येकाकडे आधार आहे. ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही, अशांना काही काळ रोखून त्यांची पूर्ण माहिती आणि पडताळणी करावी. भारत डिजिटल डेटा संकलनात अग्रेसर आहे.
गोव्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक स्वतंत्र सेल तयार करून सर्व येणाऱ्याजाणाऱ्यांची माहिती ठेवणे खूपच गरजेचे आहे. तसेच, त्यांचा संभाव्य गुन्हेगारी इतिहास तपासून, नोंदवून ठेवणे गरजेचे आहे. दरोडा टाकणारे लोक चोरीनंतर गोव्यातून बाहेर पडतात. जर डिजिटल ट्रॅकिंग मजबूत असेल, तर कोणत्या दिवशी कोण गोव्यात आला आणि कोण निघून गेला हे सहज लक्षात येईल. यात लोकांची थोडी गैरसोय होऊ शकते, परंतु गोव्याच्या सुरक्षेसाठी ती झाली तरी करणेच योग्य आहे!
हवाई मार्गाने आणि रेल्वेने येणाऱ्यांची नोंद तर आधीच मिळू शकते. त्याचप्रमाणे गोव्यात प्रवेश करणारे व बाहेर जाणारे सर्वजण यांची माहिती देण्यासाठी एक ऑनलाइन डिजिटल प्रणाली असावी. हॉटेल, गेस्ट हाउस किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांची माहितीही डिजिटल स्वरूपात नोंदवली जावी. अशी नोंदणी तेव्हाच्या तेव्हाच व्हावी. ही पद्धत चोरांचा माग काढण्यास निश्चित मदत करू शकते.
सुरुवातीला प्रक्रिया अवघड वाटेल, परंतु एकदा हे सर्व डिजिटल डेटा उपलब्ध झाला की गुन्हेगाराचा माग काढणे सोपे जाईल. गोव्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांची नियमित तपासणी व्हावी. पोलिस यंत्रणा पूर्णतः प्रभावी नसल्यामुळे, गुन्हेगार ओळखण्याचा हा एक व्यावहारिक पर्याय ठरू शकतो. म्हणून, आधार कार्डाच्या मदतीने तपशील आणि गुन्हेगारी पूर्वेतिहास मिळवण्यासाठी एक स्पष्ट कार्यपद्धती तयार व्हावी, असे मला वाटते.
गोव्यात येणारे परप्रांतीय सर्वांत जास्त वापर रेल्वेचा करतात. अनारक्षित तिकिटांसाठी कोणताही पॅसेंजर नेम रेकॉर्ड तयार केला जात नाही, त्यामुळे त्यांची नावे, संपर्क माहिती किंवा आयडी क्रमांक केंद्रीय डेटाबेसमध्ये नोंद होत नाहीत. याशिवाय, आणखी एक समस्या आहे ती म्हणजे खोट्या आधार कार्डांची ओळख पटवण्याची. वर उल्लेख केलेला सेल भारताच्या केंद्रीय आधार डेटाशी जोडला गेला, तर खोटी आधार कार्डे ओळखणे फारसे कठीण नाही. एआय प्रणाली (चॅटजीपीटी, पर्प्लेक्सिटी) यांची मदत घेणेही शक्य आहे.
राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सर्वसमावेशक आणि रिअल-टाईम डेटाबेस ठेवणे हे एक आव्हान आहे. तरी अतिथी व आततायी यातील फरक जाणण्यासाठी आणि दरोडेखोरांना ओळखण्याचे आव्हान पेलण्यासाठी एवढे तरी किमान करावेच लागेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.