
पणजी : साधारण २० वर्षांपूर्वी याच दिवशी सकाळी सकाळी शाळेत जायची गडबड असायची. गोवा मुक्तिदिन म्हणजे शाळेत जाऊन भाषण करायचं, चार लोकं आपल्यासाठी टाळ्या वाजवतील या कल्पनेने आणि मग दोन तीन तासांत घरी निघून यायचं. त्या दिवशी ना अभ्यास करायचा, ना पूर्णवेळ शाळेत थांबायची गरज होती. आपल्यासाठी कोणीतरी खूप मोठं बलिदान दिलंय म्हणून आपण एवढं छान आयुष्य जगतोय याची कल्पना होती. आज आपण जिथे राहतोय तिथे महादेव शास्त्री जोशींचं घर होतं असं आज्जी सांगते, त्यांची पत्नी सुधाताई जोशी आपल्या नात्यातल्या आहेत हे जोरजोरात ओरडून मित्रांना सांगताना भारी वाटायचं आणि आपण गोव्यात राहतोय म्हणजे खूप सुरक्षित आहोत याचं समाधान होतं.
आज २० वर्षानंतर शाळेत मुक्तिदिन साजरा केला नाही. ऑफिसमध्ये बसल्याबसल्या बातम्या करत दिवस जळपास संपत आलाय. आता सतत येणाऱ्या बातम्या जवळून पहिल्या जातायत, काही चर्चा होतायत, माहिती नसलेल्या गोष्टी समजतायत आणि राहून राहून असा प्रश्न पडतो की खरंच लहानपणी सुरक्षित वाटणारा गोवा तसाच आहे का? नसेल तर याला जबाबदार कोण? गोव्यात घडणारे गुन्हे, सामान्य लोकांच्या हालअपेष्ठा कदाचित इतर कुठल्याही व्यवसायात समजल्याही नसत्या.
कॅश फॉर जॉबच्या नावाखाली सुरु असलेला प्रकार शाळेत सुद्धा बघितलाच होता, सरकारी नोकरीसाठी पैसे द्यावे लागतील हे देखील ऐकलं होतं पण त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या गुन्ह्यात होईल अशी कधीच कल्पना केली नव्हती. वाळपईच्या कुशीत कदाचित आजूबाजूला होणाऱ्या अपघातांची आणि गुन्ह्यांची कधी झळ लागलीच नाही.
गोव्यातल्या मंदिरांत जिथे सगळे मिळून आनंदाने जायचो आज त्याच मंदिरांमध्ये देव माझा की तुझा असे वाद सुरु आहेत. २० वर्ष तुझा धर्म कोणता असा न विचारता सर्वांसोबत मैत्री केली. सेंट झेवियर माझं कॉलेज आहे असं अभिमानाने सांगितलं आज त्याच गोव्यातली लोकं आपापसात भरपूर भांडताना दिसतायत. पहिल्यांदा पुण्यात आले तेव्हा गोव्यातली लोकं कशी मिळून मिसळून राहतात याच्या बढाया मारल्या पण आज प्रश्न पडतो की आपण खरंच असं वागतोय का?
गोवा सोडून बाहेर पडल्या पडल्या तू गोव्याची आहेस म्हणजे नक्कीच बोल्ड असशील अशा अनेक प्रतिक्रिया ऐकल्या, बोल्ड असणं वाईट नाहीये पण गोव्याची आहेस म्हणून बोल्ड असणं किंबहुना त्या बोल्डचा अर्थ ज्याप्रकारे घेतला जातो ते नक्कीच खटकणारं होतं. एखादी गोव्याची मुलगी म्हणजे सतत दारू पिणारी, कमी कपडे घालून वावरणारी किंवा तोंडात शिव्या ठेऊन वावरणारी असेल असं लोकं गृहीत धरून चालतात याचं वाईट वाटतं.
गोव्याची लोकं म्हणजे पक्की सुशेगाद, त्यांना घर बसल्या हातात काम हवं असतं किंवा गोव्यातील लोकांसाठी बाहेरून आलेले सगळे घाटी अशी कुजबुज ऐकली म्हणजे खरंच आपण असे आहोत का असा प्रश्न पडतो. घरी असताना कुळागरात वावरणारी लोकं आठवतात किंवा कोणीही बाहेरून आलेला माणूस सापडला की त्याला मदत करण्यासाठी भाषा येत नसताना देखील भरपूर प्रयत्न करून त्याची मदत करणारी लोकं चटकन डोळ्यांसमोर उभी राहतात. कोण चुकतंय, काय चुकतंय यात जायचं नाही, पण काही बदल मात्र नक्कीच व्हावेत असं वाटतंय..
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.