Goa Opinion: गोव्यासाठी लढणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने विचारवंत, छोटे व्यापारी, शेतकरी यांचा समावेश होता; गोवा मुक्ती आणि विषमतेचा लढा

Goa Freedom Struggle: पोर्तुगिजांविरुद्ध लढणारे तीन प्रमुख विचारप्रवाह होते. यात पहिला व मुख्य प्रवाह होता तो गांधी आणि नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या इंडियन नॅशनल कॉंग्रेसचा.
Portuguese Rule and Goa Freedom Struggle
Portuguese Rule and Goa Freedom StruggleDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मुकुल पै रायतुरकर

गोव्याची मुक्तता भांडवलदार किंवा बड्या व्यापाऱ्यांनी केली नाही. धर्माच्या ठेकेदारांनी, धर्माचा व्यापार करणाऱ्यांनी, मठ-मठाधिशांनीही गोव्याच्या मुक्ततेसाठी काही केले नाही. या शक्ती मोठ्या प्रमाणावर पोर्तुगिजांच्या बाजूनेच राहिल्या. गोव्याच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये प्रामुख्याने विचारवंत, छोटे व्यापारी आणि शेतकरी यांचा समावेश होता.

पोर्तुगिजांविरुद्ध लढणारे तीन प्रमुख विचारप्रवाह होते. यात पहिला व मुख्य प्रवाह होता तो गांधी आणि नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या इंडियन नॅशनल कॉंग्रेसचा. दुसरा विचारप्रवाह होता तो मार्क्सवादी-लेनिनवादी - कम्युनिस्ट यांचा.

तिसरी प्रभावी विचारधारा होती जी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्यांची. यात भूमिगत, सशस्त्र क्रांती करणारे स्वातंत्र्यसैनिक होते. हे तीन प्रवाह प्रामुख्याने गोवा मुक्तीसाठी अविश्रांत लढत होते.

या तिन्ही विचारप्रवाहांना जोडणारी दोन समान उद्दिष्टे होती; पहिले, परकीय आणि हुकूमशाही राजवटीचा अंत करणे आणि दुसरे, सामाजिक-आर्थिक विषमतेचा अंत करणे. त्यांना पहिले उद्दिष्ट साध्य करता आले, पण दुसरे अद्याप काही साध्य झाले नाही.

माझे वडील आणि त्यांचे मित्र - जसे की गायतोंडे बंधू, मनोहर प्रभुदेसाई, शामराव मडकईकर, प्रभाकर घोडगे, वसंत कारापूरकर, मोहनदास विर्गिणकर, अल्वारो परेरा, अनास्तासिओ अल्मेदा, विश्वनाथ लवंदे आणि इतर अनेकांमध्ये मुक्तीनंतर झालेल्या चर्चांचा मूक साक्षीदार म्हणून मला हे समजले.

ही विषमता संपवण्यात त्यांना यश का आले नाही?

साहजिकच, हे उद्दिष्ट पोर्तुगीज राजवट संपवण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि उदात्त होते. हे समजून घेण्यासाठी आपल्याला विषमतेचे मूळ नेमके कशात आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

मानवी समाजाच्या सुरुवातीच्या काळातील ‘शिकारी आणि अन्न गोळा करणारे’ समूह प्रामुख्याने समानतेवर आधारित होते. हाच तो प्रसिद्ध आणि अनेकदा उदात्तीकरण केला जाणारा ‘नोबल सॅव्हेज’चा विचार आहे, जो आदिम मानवाला आदर्श मानतो.

फ्रेंच राज्यक्रांतीचा वैचारिक पाया रचणाऱ्या आपल्या ‘डिस्कोर्स ऑन द ओरिजिन ऑफ इनइक्वॅलिटी’(१७५५) या महाग्रंथात जीन-जॅक रुसो म्हणतात, ‘लोखंड आणि धान्य यांनी माणसाला सुसंस्कृत केले खरे, पण मानवतेचा नाश केला’.

खाजगी मालमत्ता, नागरी समाज आणि श्रम व परस्परांवर अवलंबून असणे या तीन मुद्द्यांवर रुसोने विषमतेच्या उगमाचे विश्लेषण केले आहे. रुसोच्या मते, जेव्हा एखाद्या माणसाने जमिनीच्या एका तुकड्याला कुंपण घातले आणि ‘हे माझे आहे’ असे घोषित केले, तेव्हापासून खऱ्या विषमतेची सुरुवात झाली.

यामुळे समाजात ‘श्रीमंत’ आणि ‘गरीब’ असे दोन वर्ग निर्माण झाले. याच कुंपणे घातलेल्या माणसांनी मालमत्तेच्या संरक्षणार्थ कायदे आणि नियम बनवले, ज्यातून नागरी समाज अस्तित्वात आला.

रुसोच्या मते, हा समाज श्रीमंतांनी गरिबांना नियंत्रणात ठेवण्यासाठी रचलेला एक ‘सापळा’ होता. जेव्हा मानवाने शेती आणि धातूकामासारख्या गोष्टी सुरू केल्या, तेव्हा त्याला इतरांच्या मदतीची गरज भासू लागली. या परस्पर अवलंबित्व आणि श्रमाच्या विभागणीमुळे नैसर्गिक स्वातंत्र्य नष्ट होऊन गुलामगिरी आणि विषमता वाढली.

एल्विन टॉफलर यांच्या मते शेती, उद्योग, दूरसंचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवन कायमचे बदलले. टॉफलर यांनी त्यांच्या ‘द थर्ड वेव्ह’ या पुस्तकात मानवी संस्कृतीच्या विकासाचे टप्पे ‘लाटां’च्या स्वरूपात मांडले आहेत. पहिली लाट - कृषी क्रांती : सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही लाट.

यामुळे माणूस ‘भटक्या’ अवस्थेतून स्थिर झाला आणि शेती करू लागला. कुटुंब व्यवस्था आणि स्थिर गावे याच काळात निर्माण झाली. दुसरी लाट - औद्योगिक क्रांती : सतराव्या शतकात सुरू झालेल्या या लाटेमुळे कारखाने, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि शहरीकरण आले. मानवी कष्टाची जागा यंत्रांनी घेतली.

Portuguese Rule and Goa Freedom Struggle
Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

तिसरी लाट - माहिती व दूरसंचार क्रांती : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या लाटेत संगणक, इंटरनेट आणि दूरसंचार साधनांमुळे माहितीला ‘सोनियाचे दिनु’ आले. चौथी लाट - कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती : आज ज्याला आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणतो, ती या उत्क्रांतीची पुढची पायरी आहे.

ही लाट केवळ माहिती देत नाही, तर मानवी बुद्धिमत्तेसारखे निर्णय घेण्याची क्षमता बाळगते. थोडक्यात सांगायचे तर, टॉफलर यांच्या मते प्रत्येक नवीन लाट जुन्या व्यवस्थांना मोडीत काढते आणि जगण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत रूढ करते. विषमतेची खरी सुरुवात १०,००० वर्षांपूर्वीच्या व्यावसायिक आणि कृषी क्रांतीने झाली. त्यानंतर आलेल्या लाटांनी ही विषमता अधिकच तीव्र केली.

Portuguese Rule and Goa Freedom Struggle
Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

गौतम बुद्धांपासून ते दाओ-दे-जिंग, एपिक्युरस, कार्ल मार्क्स, हेन्री डेव्हिड थोरो, महात्मा गांधी आणि जे. कृष्णमूर्ती या सर्वांनी नेहमीच भौतिकवादी व्यावसायिकतेपेक्षा साध्या आणि शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार केला आहे.

आता काय निवडायचे ते आपणच ठरवायचे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com