

सुशांत कुंकळयेकर
एका बाजूने भाजप आपल्या सर्व संघटनांना निवडणुकीसाठी सज्ज करू लागलेला असताना काँग्रेस पक्ष अजूनही हात-पाय हलवायला लागलेलाच नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. अशात आता अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली उतरवून त्याजागी गिरीश चोडणकर यांना बसविल्याने पुन्हा एकदा पक्षात काही ठिकाणी नाराजीचे वातावरण पसरले आहे.
अशा स्थितीत काँग्रेस खरेच भाजपला शिंगावर घेऊ शकणार का हाच मोठा प्रश्न असून सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडे नाही, असेच दिसते. काँग्रेसकडे मतदार आहेत पण त्यांना ‘चार्ज’ करण्यासाठी कुठलाही जबरदस्त ताकद असलेला नेता नाही आणि निवडणुकीवेळी मतदारांना घराबाहेर काढून मतदानासाठी नेणारा कार्यकर्ता नाही, अशी काँग्रेसची एकंदर स्थिती आहे. या उलट प्रत्येक बुथवर भाजपची कार्यकर्त्यांची फौज मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कधीचीच कामाला लागली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत गोव्यातून भाजपला सत्ताभ्रष्ट करायचे झाल्यास काँग्रेसने आतापासून कामाला सुरुवात करणे अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, जेव्हा नवीन बदल होतात त्यावेळी काही प्रमाणात खळखळ होणे हे अपेक्षित असतेच. मात्र काही दिवसांनी सगळे काही रुळावर येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेसची सध्या गोव्यात रुळावरून घसरलेली गाडी गिरीश चोडणकर कितपत रुळावर आणू शकतील, हे पहावे लागणार आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात काँग्रेसने विजय मिळविल्यावर खरे तर काँग्रेससाठी निदान दक्षिण गोव्यात पोषक वातावरण होते. अल्पसंख्यांक मतदार भाजपला मतदान करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीत, हे मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीने दाखवून दिले होते. सध्या कॉंग्रेस पक्षाबाबतही त्यांना संशय आहे.
विशेषतः सासष्टी तालुक्यातील मतदारांनी काँग्रेससाठी एकगठ्ठा मतदान करताना ‘आप’ आणि आरजी या पक्षांनाही दोन हात दूर ठेवले. खरे तर काँग्रेसने या या वातावरणाचा फायदा उठवत या भागात आपले संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र, तसे काही झालेले दिसत नाही. अमित पाटकर आणि खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आपल्यापरीने तसा प्रयत्न सुरू केला होता ही गोष्ट खरी असली तरी निवडणूक तोंडावर आलेली असताना नेतृत्व बदल झाल्याने या प्रक्रियेत सध्या खंड पडला आहे.
भाजप विरोधी मतांमध्ये विभागणी झाली नाही तर भाजपला हरवता येते, हे दक्षिण गोवा लोकसभा आणि नंतर झेडपी निवडणूक निकालाने दाखवून दिले. त्यामुळे सर्व विरोधकांना बरोबर घेऊन गेले तरच भाजपला शिंगावर घेता येणे शक्य होते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणण्यास खरे तर काँग्रेसने प्रयत्न करणे आवश्यक होते.
प्रसंगी अन्य विरोधी पक्षांना वाव देण्याची गरज होती. पण काँग्रेसने अलिप्त रहाणेच पसंत केले असे वाटते, त्यामुळे आता काँग्रेस खरेच काही करणार की फक्त जनता सरकारला धडा शिकवेल याच आशेवर वाटचाल करत आलेली काँग्रेस तोच मार्ग पत्करणार हे चोडणकर यांना बदल घडवत दाखवून द्यावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.