
शंभू भाऊ बांदेकर
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते आणि ते बरोबरच आहे. कारण पंतप्रधानपदाची धुरा सांभाळताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि शांतीचा पुरस्कार करीत त्यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारत देशाचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न केला.
आज आपण ज्ञान, विज्ञान, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांपासून कृषिक्षेत्रापर्यंत जी झेप घेतली आहे आणि देश ‘सुजलाम, सुफलाम’, होण्यासाठी तत्परता दाखविली आहे, त्या साऱ्यांमध्ये पं. नेहरूंचा दूरदर्शीपणा, त्यांचा उत्साह, तळमळ आणि जिद्द कारणीभूत होती.
पं. नेहरू हे खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, पक्षकारण यातील मुत्सद्दीपणा, जाणत्या व कर्तबगार नेत्यांचा सहभाग आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे सारे आपण पाहिले तर त्यांच्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वाची आपणास ओळख होते.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून सक्रिय असताना त्यांनी सहकार क्षेत्रांपासून इस्रोपर्यंत आणि देशाला समाजवादी समाजरचनेत सामील करून घेतानाच देशातील विविधतेतील एकता व एकतेतील विविधता जोपासण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे काम केले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे पहिले तरुण अध्यक्ष, ऐन उमेदीच्या काळात देश स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेऊन दहा वर्षांपेक्षा जास्त वर्षे भोगलेला तुरुंगवास, जागतिक कीर्तीचे लेखक, बाळ-गोपाळांचे चाचा आणि जागतिक शांतिदूत असे अनेक आदर्श पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.
ते आपल्या विचारांशी ठाम होते, आग्रही होते, पण हट्टाग्रही नव्हते. त्यांची एखादी चूक लक्षात आणून दिली, तर ते त्यावर पुन्हा विचार करीत आपली चूक मान्य करीत व त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत. ते जसे संयमी, विवेकी व सौजन्यशील होते.
तसेच ते शीघ्रकोपीही होते. पण मग विचारानंतर आपण इतका संताप करायला नको होता, असे लक्षात आल्यावर त्या व्यक्तीची ताबडतोब भेट घेऊन किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आपला सगळा राग विसरून जात. त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळीत अभावानेच टोकाची भूमिका घेतली जाई.
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली, तरी अजूनही देशाच्या संविधानावर उलटसुलट चर्चा झालेली आपण पाहतो, पण पं. नेहरूंनी १९६१मधील आपल्या नवी दिल्लीतील भाषणात स्पष्टपणे सांगितले होते की, आपण आपल्या संविधानामध्ये उल्लेख केला आहे की, भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे.
याचा अर्थ असा मात्र नव्हे की, आपला देश अधार्मिक आहे; तर याचा अर्थ असा आहे की, या देशातील सर्व जाती- धर्माच्या लोकांचा हा देश सारखाच सन्मान करतो आणि सर्वांना समान पातळीवर आणण्याचा, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो’. आज संविधानाच्या माध्यमातून जे काही चालले आहे, त्याला आळा बसायचा असेल तर पं. नेहरूंनी ज्या संविधानातील बाबींचा उल्लेख केला, त्याला गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.
आर्थिक धोरणाप्रमाणेच परराष्ट्रधोरणही, त्यात एकांगी विचार करून चालणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली व या भूमिकेचे स्वागतही झाले. याबाबतीत त्यांचा विशेष कल हा रशियाशी होता. रशियाचे नेते क्रुश्चेन व बुल्गानीन या दोघांनीही त्यांचे संबंध मित्रत्वाचे होते.
याबाबत त्यांच्यावर टीकाही झाली. ते त्याबाबत म्हणत, ‘कोणत्याही इतर देशांशी असलेल्या संबंधामुळे आपण कुणाचे मिंधे न होता एकमेकांच्या व्यापारविषयक, दळणवळण विषयक संबंधामध्ये कशी सुधारणा करता येईल. याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे’.
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ जो १४ नोव्हेंबर आपण बालदिन म्हणून चाचांच्या स्मरणार्थ साजरा करतो. आणि २७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले आज त्यांची पुण्यतिथी. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून स्वतंत्र भारताच्या चौफेर विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पं. नेहरू यांना आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र प्रणाम.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.