
विचारवंत लेखकाने लिहिले आहे. गद्य लेखन हे मंदिर बांधण्यासारखे आहे. किती प्रतीकात्मक आहे हा विचार. फार खोल. मंदिरात आपण जातो कारण भवसागरात तप्त झालेलो असतो. तिथे बसल्यावर आपसूक प्रार्थना होते. तिथे बाहेरचा गोंधळ गोंगाट नसतो. एक वेगळाच विराम व आराम मिळतो. थकवा दूर होऊन विसावा मिळतो. आत जाताना तप्त व बाहेर येताना आपण तृप्त असतो. एक दिलासा मिळतो. मंदिरात एक पावित्र्य नांदत असते. त्याच्याशी आपण एकरूप होतो.
मंदिराची बांधणी म्हणजे काही वसाहतीची, फ्लॅट कॉलनीची बांधणी नव्हे. तिथे विधिपूर्वक पायाभरणी करावी लागते. मंत्रोच्चार असतो. सात्त्विक लहरींच्या वातावरणात म्हणजेच दिव्यत्वाच्या भारीत वलयात पूजाविधीसह हे सर्व केले जाते. विशुद्ध असे मंत्रविधी वगैरे झाल्यावरच स्टेप बाय स्टेप ही बांधकामे होत असतात.
मंदिराला पाया असतो. मंदिराला कलश असतो. प्रदक्षिणा घालण्यासाठी मोकळी सभोवतालची जागा ठेवावी लागते. मोठ्ठे खांब असतात. गर्भगृहाबाहेर ज्या अतिपवित्र स्थानावर आपण बसतो त्याला गोव्यात ‘चौक’ म्हणतात. चौकाबाहेरच्या फरशीला ‘सरवळी’ म्हणतात. सगळे काही मोजून मापून बांधावे लागते. मंदिराच्या सर्व भागांत ईश्वरी शक्तीचा वास प्रत्ययाला येत असतो. मंदिरात शांती व शांतता नांदते. असे काही तरी अर्क, मर्म व सार साहित्याच्या मंदिरात व विशेष करून शब्दशिल्पाच्या गर्भगृहात असावे लागते.
एकदा मला एका मुलाखतकाराने प्रश्न केला, फिक्शन किंवा इतर साहित्य असो, तुम्हांला ही प्रतीके, प्रतिमा कशा सुचतात? मी त्याला एक प्रतीकात्मक बोधकथा देऊन हे स्पष्ट केले. एका मुलाने शंभर पायांची ‘गोटाण’ (गोम किंवा घोण) असते तिला विचारले, ‘तू चालताना अगोदर पहिला पाय कुठला उचलतेस? डाव्या बाजूचा पहिला की उजव्या बाजूचा दुसरा?’ आणि नंतर? ती विचार करू लागली. जो तिने आजवर कधीच केला नव्हता. विचार करता करता ती होती तिथेच थबकली. एक कण पुढे पोहोचली नाही. किंबहुना, ती चालतानाच तोल जाऊन पडली.
लेखकाच्या अंत:प्रेरणा या अशा असतात. कसे येते, कुठून येते, काही कळत नाही. पण ऊर्मी ऊर्जामय असते. अमूर्त, अदृश्य असते ते. पण शरीरभर वरपासून खालपर्यंत हा प्रवाह आनंद देऊन जातो. मंदिरासाठी चिरे लागतात, साहित्यकृतीसाठी फक्त शब्द कामी येतात. ते शब्द योग्य आणि चपखल पद्धतीने बसवावे लागतात.
साहित्यात (Literature) शांत शांत, कलात्मक, सृजनात्मक विसावा हवा. जसा मंदिरात असतो. पृथ्वीवर रेतीचे कण आहेत तितकी दु:खे सभोवताली आहेत. पण चांदणे पौर्णिमेला चमकते तितकेच सौख्यही जीवनात आहे. अधोरेखित काय करावे ही लेखकाची निवड असते. लेखनातून रड दाखवावी की आनंदाकडे पाहायचा दृष्टिकोन हे महत्त्वाचे. शोक आहे, दु:ख आहे, वेदना आहे, दगदग आहे, पण तेच परत परत दर्शवून काय साध्य होईल? नकारात्मकतेचे शब्द-चिरे लेखकाने लावले तर त्या शब्द मंदिरात कसली शांती नांदणार?
मंदिरात स्वच्छता असते. कमालीची. आपले लेखन म्हणजे मंदिर उभारण्यासारळे असे जो विचारवंत लेखक म्हणतो, त्यात साहित्य निर्मिती स्वच्छ असावी हा संकेत दिसतो. स्वच्छ म्हणजे सर्वार्थाने स्वच्छ. तिथे गलिच्छपणा, ओंगळपणा नाही. भाषा अगदी स्पष्ट म्हणजे काय सांगायचेय त्या विषयी संदिग्धतेचा लेश नको. आता लेखकाचे अंतरंग स्वच्छ असल्याखेरीज त्याच्या सादरीकरणात स्वच्छता कशी येणार? मंदिरात जशी सोवळ्याओवळ्याची संहिता असते तशीच संहिता लेखकाच्या आचार विचारांना नको का?
मी माझा लेख स्वच्छ व्हावा म्हणून छापण्याअगोदर दोन मित्रांना दाखवतो. त्यांच्याकडे सल्लामसलत करतो. मथळा धरून शेवटपर्यंत बारकाईने त्यांना विचारतो. त्यांची मते घेतो. जे काही बदल मला पटतात ते जरूर करतो.
लेखकाला कधी काय सुचेल हे त्याच्या हातात नसते. मनाच्या पडद्याआड अनेक आंदोलने, कंपने चालू असतात. वैचारिक स्फटिकीकरणांची. अकस्मात एक दिव्य तरंग आल्यासारळे काही तरी आकाराला येते. ‘आपल्याला कागदावर उतरव’, म्हणून रुंजी घालू लागते. अशा प्रकारे निर्मिती प्रक्रिया फार गहन असते.
एक अनुभव सांगतो. माझे नाट्यलेखनाचे काम चालू होते. पहिल्या अंकाचे लेखन चालले होते. मी आकाशवाणीवर ड्युटीला होतो. दुपारचे एक व दोनचे बुलेटिन वाचले. भूक लागली होती. टिफीन उघडायला होईना. एक नाट्यप्रवेश अक्षरश: मला व्यापून घट्ट पकडून पछाडल्यागत छळत होता. मला आत्ताच्या आत्ता कागदावर उतरव असे काही ही प्रेरणा बोलत होती.
टिफीन बाजूला ठेवला. धडाधड सात आठ पाने लिहून काढली. या सगळ्याचे मलाच आश्चर्य वाटले. हे नाटक आविष्कृत व्हायच्या आधी दिग्दर्शक मला म्हणाला, ‘हे बघा लेखकराव, हा जो आगळा प्रवेश तुम्ही रचलात, तो कितपत उंचीवर जाणार, की कितपत तो खाली येऊन ढेपाळेल ही सगळीच अनिश्चितता आहे’. मी गप्प राहिलो. अंत:स्फूर्तीने मी तो प्रवेश लिहिला होता. कला अकादमीच्या डाव्या बाजूच्या विंगेच्या कोपऱ्याजवळ नाटकातील हा प्रवेश खास प्रकाशझोतात साकारला. अतीव सुंदर असा तो वठला. सर्वांगसुंदर प्रवेश ठरला.
तात्पर्य, अगदी आतून खोलवरून जे काही येते ते दिव्यत्वाच्या गाभ्यातून येते. ते अयशस्वी होऊ शकत नाही. हे मी शिकलो. फक्त लेखकाने त्या गाभ्याला चिकटून, तादात्म्य पावून राहायला पाहिजे. मंदिरात दिव्यत्वाची स्पंदने व्यापून असतात. लेखनातही ती तशीच रुणुझुणु खेळत असायला हवी. तेव्हाच तो कला आविष्कार आनंददायी होतो.
स्फूर्तीमय लेखनाचेही असेच असते. ते व्याख्येत बसत नाही. मंदिरातील शांतता सांगता येत नाही. खऱ्या साहित्यकृतीची अनुभूतीही अशीच आनंद-सुगंध देणारी असते. मंदिरात सात्त्विकता व सगळे काही नैसर्गिक, प्राकृतिक स्वरूपात झाडपिक्या रामफळा(आंतेरा)सारखे असते. साहित्यातही ते असावे. झाडावरील पक्व फळासारखे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.