

mumbai pune mumbai 4 announcement: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लाडकी रोमँटिक फ्रँचायझी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मुंबई पुणे मुंबई'च्या चौथ्या भागाची अधिकृत घोषणा झाली आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रेम प्रवास आता नव्या टप्प्यावर पोहोचणार असून, प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे पुन्हा एकदा 'गौरी' आणि 'गौतम' च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनीच या चौथ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या कल्पकतेतून साकारलेला 'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट २०१० साली पहिल्यांदा प्रदर्शित झाला. मुंबईची मुलगी गौरी आणि पुण्याचा मुलगा गौतम यांची आगळीवेगळी भेट, सुरुवातीचे खटके आणि नंतर फुललेले प्रेम प्रेक्षकांना फार भावले. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक फ्रेश आणि आधुनिक प्रेमकथा दिली.
२०१५ मध्ये 'मुंबई पुणे मुंबई २' मध्ये गौरी आणि गौतम यांच्या लग्नाची तयारी आणि दोन वेगळ्या कुटुंबांमधील गोड-कौटुंबिक संघर्ष दाखवण्यात आला. तर २०१८ मधील तिसऱ्या भागामध्ये हे दोघे आई-बाबा होण्याच्या टप्प्यावर पोहोचले, जिथे त्यांच्यातील नात्याची परिपक्वता आणि जबाबदारीचा गोंडस अनुभव प्रेक्षकांना मिळाला. प्रत्येक भागात प्रेक्षकांनी या नात्यातील प्रत्येक चढ-उताराला भरभरून प्रेम दिले, ज्यामुळे या फ्रँचायझीने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा बेंचमार्क सेट केला.
'मुंबई पुणे मुंबई ४' च्या घोषणेमुळे सध्या सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या चौथ्या भागाबद्दल माहिती देणारा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मागील तीन भागांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे, ज्यात '१५ वर्षांपूर्वी सुरु झाला एक रोमँटिक प्रवास…' या टॅगलाइनसह 'नात्यांचा गोडवा वाढवायला, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे' ही घोषणा करण्यात आली आहे.
ज्या प्रेक्षकांनी गौरी आणि गौतमला भेटताना पाहिले, त्यांच्या लग्नाची तयारी अनुभवली आणि त्यांना आई-बाबा होताना पाहिले, त्या सर्व चाहत्यांसाठी ही घोषणा एक सुखद धक्का आहे. प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दर्शवतात की, ही जोडी आणि त्यांची कथा आजही तेवढीच ताजी आणि लोकप्रिय आहे.
गौरी आणि गौतमची प्रेमकथा केवळ एका विशिष्ट टप्प्यावर थांबणारी नाही. 'मुंबई पुणे मुंबई ३' मध्ये ते पालक बनले. आता चौथ्या भागात त्यांच्या आयुष्यातील कोणता नवा अध्याय सुरू होतोय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पालकत्वाची नवी आव्हाने, करिअर आणि कुटुंबाचा समतोल साधताना त्यांची केमिस्ट्री कशी टिकून राहते, किंवा बदलत्या जगात 'गौरी-गौतम' च्या नात्यात आणखी कोणते नवीन पैलू येतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे, तसेच निर्मिती करणारे संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. 'मुंबई पुणे मुंबई ४' हा केवळ एक चित्रपट नसून, तो मराठी प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या एका सुंदर नात्याचा पुढचा प्रवास आहे. गौरी आणि गौतमच्या नव्या प्रवासाची तारीख लवकरच जाहीर होईल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.