
गोवा मराठी चित्रपट महोत्सवात कुठेही प्रदर्शित न झालेले नवे कोरे मराठी चित्रपट पाहण्याची एक विशेष संधी असते. महोत्सवाच्या यंदाच्या आवृत्तीत देखील ही संधी मराठी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.
१९७०च्या दशकात, लंडनमध्ये राहणारा एक तरुण फिल्ममेकर अभिजात, गोव्यातील आपल्या मूळ गावात चित्रपट करण्यासाठी, पत्नी सोनियासोबत लोकेशन हंटिंगसाठी येतो. तिथे तो आपल्या जुन्या नाट्यगटात पुन्हा सामील होतो आणि एका नाट्यमहोत्सवासाठी नाटक बसवतो. सोनिया नाराज होते पण अभिजातच्या नाट्यप्रेमाला पर्याय नसतो.
अभिजातचा सिनेमा निर्मितीचा संघर्ष सुरू राहतो. निर्माता मिळत नाही, स्क्रिप्ट नाकारली जाते. शेवटी, जुन्या मित्राच्या सल्ल्याने तो पुन्हा प्रयत्न करतो. कमी बजेटमध्ये एक संधी मिळते, आणि तो ती स्वीकारतो. प्रेम, प्रतिष्ठा, स्वप्न गमावल्यावरही अभिजात आता एक सशक्त कलाकृती निर्माण करू शकेल का याच प्रश्नाचा वेध 'निरवधी घेतो'.
सतरा वर्षीय अमायरा, उत्साही आणि क्रिकेटप्रेमी, बर्मिंगहॅममधील ५० वर्षीय रेस्टॉरंट मालक शुभंकरशी भावनिक बांधिलकीने संघर्ष करत असलेल्या एका अविश्वसनीय बंधात अडकते. भावनांचे नाजूक धागे उलगडणार्या 'अमायरा'मधून नात्यांची शोधयात्रा अनुभवायला मिळते. 'कधी नातं शोधावं लागतं, आणि कधी स्वतःला…' हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. अमायरा'मधून नात्यांमधील जवळीक, तुटकपणा, गैरसमज, आणि आत्मशोधाचा संघर्ष सादर केला गेला आहे. 'अमायरा'च्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील कठीण निर्णय, भावनिक संघर्ष आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास होतो. हा चित्रपट आपल्या अनेकांच्या आयुष्यातून उमटलेली भावना आहे, जी प्रत्येकाला आपलीशी वाटेल.
जित्राबमध्ये आपल्या समाजातील खोल विरोधाभासांना साद घातलेली दिसते. एकीकडे गायीला दैवी मानून पूजा केली जाते, पण तिची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. नामदेव एक दुष्काळग्रस्त शेतकरी आहे, ज्याची शेती संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे. त्यातच त्याच्या लाडक्या गायीने, राणीने दूध देणे बंद केले आहे आणि गरिबीमुळे तो तिला आता चारादेखील देऊ शकत नाही.
दु:खी नामदेव राणीला विकण्याचा प्रयत्न करतो, परंतु दूध न देणारी गाय कुणालाच नको असते. त्याला हे जाणवते की लोक गायीबद्दल आदराने बोलत असले तरी कोणीही तिची जबाबदारी घेण्यास तयार नाही. निराश आणि हताश झालेला नामदेव त्याच्या गावातून मुंबईत उपाय शोधण्याच्या आशेने प्रवास करतो. तिथे, त्याला केवळ राणीलाच नव्हे तर शेकडो इतर वृद्ध, दुर्लक्षित गायींना मदत करण्याचा एक अनपेक्षित मार्ग सापडतो.
दृश्य अदृश्य” ही एका शांत निवांत असलेल्या पिकनिक स्पॉटवर एका लहान मुलगा गायब होण्याने घडणारी कथा आहे. मुलाचे कुटुंबीय, स्थानिक प्रशासन आणि साक्षीदारांच्या नजरेतून त्यातील नाट्य उलगडत जाते. हरवलेल्या मुलाचा शोध सुरू असताना अनेक बाबी समोर येऊ लागतात आणि नाट्य वेगळ्याच दिशेला जाताना दिसते. भावना आणि वास्तवाचा सुरेख समतोल साधत गोष्ट साकारत जाते. मानवी भावना, दृश्य सामाजिकता, अदृश्य मानसिकता आणि आत्मिक शक्ती माणसांवर कसा प्रभाव टाकतात याचा यात वेध घेतला आहे.
“दृश्य अदृश्य” हा रहस्यपट नाही, तर एक मनाचा आरसा आहे- दृश्यामागच्या अदृश्य वास्तवाची ती शोधयात्रा आहे.
पोलिसांपासून पळून जाताना, सचिन, अपघाताने गुन्हेगार झालेला एक माणूस मुंबईच्या एका जीर्ण चाळीतील ओसाड खोलीत आश्रय घेतो. पण आता तो तिथे एकटा नाही. त्या खोलीत राहणारा एक वेडा म्हातारा माणूस आहे, जो त्याच्या पत्नीच्या हत्येचा कट रचत आहे- हा गुन्हा करायचा प्रयत्न तो कित्येक वर्षांपासून करत आहे.
थोडक्यात एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल ‘आतली बातमी फुटली’ या धमाल चित्रपटातून पाहायला मिळते. विनोदी शैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळणे घेत प्रत्येकाला आश्चर्यचकित करत राहतो.
एका भारतीय महिलेच्या मालकीच्या यूकेस्थित ट्रॅव्हल एजन्सीसाठी एक कुशल छायाचित्रकार छायाचित्रणाच्या कामासाठी नियुक्त केला जातो. ती दोघे एकत्र प्रवास करत असताना त्यांच्यात काहीशी जवळीकता तयार होते पण त्या दरम्यान कळते की त्यात एक गुंतागुंत आहे- छायाचित्रकार स्वतःला प्लेबॉय मानतो आणि तो प्रेम किंवा एकपत्नीत्वाच्या विरोधात आहे आणि ती मात्र नातेसंबधवर विश्वास ठेवणारी आहे. जेव्हा तिला कळते कि, आपण त्याचे मन बदलू शकत नाही, तेव्हा प्रेमभंग झालेली ती सगळ्यापासून दूर जाते.
दोघांच्याही आठवणी आणि निराकरण न झालेल्या भावना मात्र कायम असतात. प्रेमभंग, अहंकार आणि भावना यांच्यापैकी खरोखरच काय हवे आहे, याची निवड करावीच लागते. त्यामुळे आता प्रश्न आहे- तो स्वातंत्र्यापेक्षा असुरक्षितता निवडेल का? ती प्रेमात दुसरी संधी घेईल का?
आधुनिक पद्धतीने होत असलेल्या शेतीची अवस्था पाहून एका तत्त्वनिष्ठ वकिलाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच डळमळीत होतो. त्याच्या दृष्टीने केवळ माती आणि पिकांनाच नव्हे तर निसर्गाच्या एकूण संतुलनाला हानी पोहोचवणारी ही प्रगती विनाशकारी आहे. पृथ्वीकडे एक सलग कुटुंब म्हणून पाहणाऱ्या या वकिलाच्या सगळया धारणांना तडे जाऊ लागतात. प्राणिमात्रांच्या जीवावर उठलेल्या विज्ञान आणि शाश्वततेमधील वाढत्या विसंगतीमुळे तो खूप अस्वस्थ होत राहतो.
तो आपले आरामदायी जीवन बाजूला ठेवतो आणि एक दृढ प्रवासाला सुरुवात करतो. केवळ उत्तरे शोधण्याचाच नव्हे तर जबाबदारी आणि सुसंवादाचा शोध घ्यायला तो सुरुवात करतो. स्वतःपासून सुरु झालेला त्याचा हा प्रवास एक मोठी नैतिक आणि पर्यावरणीय मोहिम बनते. शोषणकारी व्यवस्थांना त्याने दिलेले आव्हान अनियंत्रित, कथित विकासाच्या दूरगामी परिणामांना वाचा फोडते आणि तो केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर सकल मनुष्यांसाठी वरदान ठरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.