
नृसिंह अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. भगवान विष्णूने हा नृसिंह अवतार हिरण्यकश्यपूच्या वधासाठी घेतला गेला होता याची आपल्याला माहिती आहे. पण नृसिंह अवताराचे पुढे काय झाले याची आपणास माहिती आहे का?
हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूने पृथ्वीवर उत्पात माजवला. त्याने आपली राक्षससेना सज्ज केली. सर्वत्र पृथ्वीवर धुमाकूळ घातला. शक्ती मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर हिरण्यकश्यपूने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला काय हवे ते विचारले.
‘हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. ' असा वर त्याने ब्रह्मदेवांकडे मागितला.
ब्रह्मदेवांनी त्याला इप्सित वर दिला. हा वर प्राप्त झाल्यावर हिरण्यकश्यपूचे सामर्थ्य वाढले. त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला. त्याच्या उन्मादामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध मीच करेन असे जाहीर केले.
हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा पुत्र होता. प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादला विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे?
प्रल्हादने मला विष्णूचे नामस्मरण सर्वात प्रिय आहे असे सांगितले. या उत्तराने हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या असा आदेश आपल्या सेवकांना दिला. सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंच्या शक्तीमुळे तो वाचला.
हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, त्याला आगीत ढकलले पण या भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने या सर्वांचा काही उपयोग झाला नाही.
हिरण्यकश्यपूने संतापून विचारले सांग, तो विष्णू कोठे आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला की,हे सर्व जगच नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी विष्णू वास करत आहेत. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला मग या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू? प्रल्हादाने यावर होकारार्थी उत्तर दिले.
हे ऐकताच हिरण्यकश्यपूने त्या खांबावर गदेने प्रहार केला. त्या खांबातून भयंकर आवाज उत्पन्न झाला आणि मनुष्याचे धड तसेच सिंहाचे तोंड असलेला भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार प्रकट झाला. श्री नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. ही कथा आपणास माहित आहेच.
हिरण्यकश्यपूचा वध करताना भगवान नरसिंह प्रचंड क्रोधीत झाले. हिरण्यकश्यपूचा वध झाला तरी त्याचा राग शांत होईना. त्यांच्या आवाजाने तीन्ही लोक डळमळू लागले. देव भयभीत झाले. त्यांना शांत करण्यासाठी शक्तिशाली अवताराची गरज भासू लागली.
परिस्थितीचा अंदाज घेऊन भगवान शंकरानी शरभ अवतार धारण केला. हा शरभ अवतार अद्भुत होता. चेहरा सिंहाचा, आठ पाय, दोन शक्तिशाली पंख, एक हजार सुदृढ हात आणि कपाळी चंद्र असलेला हा भव्य अवतार पृथ्वीवर अवतरला.
नृसिंह अवतार आणि शरभ अवतारात भयानक द्वंद्व झाले. भूमंडळाची उलथापालथ झाली. काही कालावधीनंतर भगवान नृसिंह शांत झाले आणि हे दोन्ही अवतार अंतर्धान पावले. या द्वंद्वात जय पराजय हा भाग न्हवता. विश्वाच्या पालक आणि संहारक शक्तींनी आपली भूमिका समजून घ्यावी यासाठीची ही रचना होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.