
श्रीनगर: भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर सीमेपलीकडून झालेल्या तीव्र गोळीबारामुळे उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील तंगधर आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उरी या सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे शेकडो कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत.
तंगधर विभागात नियंत्रण रेषेवरून (एलओसी) झालेल्या जोरदार गोळीबारामुळे किमान २० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी दुजोरा दिला आहे. याव्यतिरिक्त काही दुकाने, दोन शाळेच्या इमारती, गोठे आणि मदरशांचे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबारामुळे जवळपास १०० घरांचे अंशतः नुकसान झाले.
भीतीने अनेकांवर गाव सोडण्याची किंवा तात्पुरत्या बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गोळीबार झाला असून अधूनमधून सुरूच आहे. यामुळे बाहेर पडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘‘आमचे मोठे नुकसान झाले आहे. छते कोसळली आहेत, भिंतींना तडे गेले आहेत आणि आमचे पशुधनाच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांच्या डोक्यावरील छप्पर नाहीसे झाले आहे,’’ अशी व्यथा तंगधर येथील एका स्थानिकाने मांडली.
बारामुल्ला जिल्ह्यातील उरी विभागातही असेच चित्र आहे. परिसरात झालेल्या तोफगोळ्यांच्या वर्षावात ४०० घरांसह, दुकाने आणि मशिदींचे नुकसान झाले आहे. काही तोफगोळे थेट निवासी परिसरात पडले तर काही छतांवर फुटले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अधूनमधून होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळील दाट लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘‘आमच्या छतावर एक गोळा पडला तेव्हा आम्ही घरात होतो. संपूर्ण घर हादरले, खिडक्या तुटल्या. आम्ही जीव वाचवण्यासाठी पळत सुटलो. शेजाऱ्यांचे घर काँक्रिटचे असल्याने आम्ही तेथे रात्र काढली,’’ असे उरी येथील एका रहिवाशाने सांगितले. स्थानिक अधिकारी सध्या नुकसानीचा आढावा घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.