

Ahmed Sharif Chaudhary ISPR Press Conference: स्वतःच्या देशातील अंतर्गत कलह, आर्थिक दिवाळखोरी आणि राजकीय अस्थिरतेवरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी अत्यंत 'सडकछाप' भाषेचा वापर करत भारताला पोकळ धमकी दिली. एवढच नव्हे, तर लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांनीही 'गजवा-ए-हिंद'चा नारा देत भारताच्या सर्वोच्च नेतृत्वाला उघड धमकी दिली. याही पलीकडे जाऊन पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'ISI' आता भारतीय लहान मुलांचे ब्रेनवॉश करुन त्यांच्याकडून हेरगिरी करवून घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे (ISPR) महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतावर गरळ ओकली. अफगाणिस्तानसोबत सुरु असलेल्या संघर्षाचे खापर भारतावर (India) फोडताना त्यांनी चित्रपटांमधील संवाद वाटावेत अशी भाषा वापरली. चौधरी म्हणाले, "आम्ही कुठे उभे आहोत आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर 2026 वर्ष कसे असेल हे ठरेल. भारताला आपले अस्तित्व मान्य नाही, हे स्पष्ट आहे."
पुढे मग्रुरीने बोलताना ते म्हणाले, "तुम्ही उजवीकडून या किंवा डावीकडून, एकटे या किंवा कोणासोबत मिळून या... जर तुम्हाला धडा शिकवला नाहीतर पैसे परत देतो..!" एका जबाबदार लष्करी पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची भाषा वापरल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
त्याचवेळी, पाकिस्तानने आता भारताच्या सुरक्षेला धक्का लावण्यासाठी एक अत्यंत धक्कादायक मार्ग निवडला आहे. 'व्हाईट कॉलर' दहशतवादानंतर आता ISI लहान मुलांच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ते 17 वयोगटातील मुलांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांचे 'ब्रेनवॉश' केले जात आहे. त्यांना ऑनलाईन जाळ्यात ओढून भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींचे व्हिडिओ आणि फोटो पाठवण्यास भाग पाडले जात आहे. सध्या भारतातील 37 हून अधिक अल्पवयीन मुले सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये पंजाब आणि हरियाणातील 12, तर जम्मू-काश्मीरमधील 25 मुलांचा समावेश आहे. कोवळ्या वयातील मुलांचा असा वापर करणे पाकिस्तानच्या वैफल्याचे लक्षण मानले जाते.
दुसरीकडे, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा बहावलपूर प्रमुख सैफुल्ला सैफ याने जाहीर सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली. त्याने 'गजवा-ए-हिंद'चा नारा देत भारताला जिहादची धमकी दिली. भारतीय नेत्यांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत त्याने दहशतवाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पाकिस्तान सरकार आणि तिथले लष्कर या दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देत असल्याचे यावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही यापूर्वी असे आरोप केले होते की, भारत अफगाणिस्तान आणि 'TTP' सोबत मिळून पाकिस्तानविरुद्ध कट रचत आहे. मात्र, वास्तवात स्वतःच्या देशातील दहशतवाद हाताळण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तान (Pakistan) प्रशासन केवळ भारताविरुद्ध द्वेष पसरवून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.