

न्यूयॉर्क: भारताचा जन्मदर सातत्याने घटत असून, तो आता लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक दराच्या खाली आला असल्याचे निरीक्षण ‘स्पेसएक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी नोंदवले आहे. सुशिक्षित वर्गामध्ये हा दर अनेक वर्षांपूर्वीच कमी झाला असल्याचे मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘एएफ पोस्ट’ या माध्यम संस्थेने दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ उद्योगपती मस्क यांनी दिला. या आकडेवारीनुसार, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजनन दर (टीएफआर) २.३ वरून १.९ पर्यंत खाली आला आहे. दिल्लीचा प्रजनन दर १.२ पर्यंत घसरला असून, तो फिनलंडपेक्षाही कमी आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) २०२५ च्या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर पोहोचला आहे.
लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी २.१ या दराची आवश्यकता असते. याचा अर्थ स्थलांतर वगळता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लोकसंख्येचे प्रमाण कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलांच्या संख्येपेक्षा भारतीय महिला सरासरी कमी मुलांना जन्म देत आहेत.
भारताची सध्याची लोकसंख्या १४६ कोटींहून अधिक असून, २०२३ मध्ये चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाली असली तरी माता मृत्यू दर व लिंगभेद या समस्या कायम असल्याचे ‘यूएन एफपीए’ने नमूद केले आहे.
महिलांचे वाढते शिक्षण, शहरीकरण, करिअरला दिले जाणारे प्राधान्य आणि विवाहाचे वाढते वय, सतत वाढत चाललेली महागाई ही जन्मदर घसरणीमागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार, शिक्षित महिलांचा प्रजनन दर १.८ आहे, तर अशिक्षित महिलांचा ३.२ आहे. यामुळे येत्या ४० वर्षांत भारताची लोकसंख्या १.७ अब्जांपर्यंत पोहोचून नंतर घटण्यास सुरुवात होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.