

Hindu Youth killed In Bangladesh: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत कट्टरपंथीयांनी हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. आता पुन्हा एकदा एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. जेसोर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राणा प्रताप बैरागी या तरुणाला कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केले. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायामध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
राणा प्रताप बैरागीची हत्या ही गेल्या तीन आठवड्यांतील अशा प्रकारची पाचवी घटना आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर येऊन कट्टरपंथी लोक हिंसाचार करत असून हिंदूंना वेचून वेचून लक्ष्य केले जात आहे. डिसेंबर 2025 च्या अखेरीस सुरु झालेला हा हिंसाचाराचा प्रवास जानेवारी 2026 पर्यंत अधिक भीषण झाला आहे. लिंचिंग (जमावाकडून मारहाण), जाळपोळ आणि जीवघेणे हल्ले यामध्ये आतापर्यंत किमान 4 ते 5 हिंदू तरुणांचा बळी गेला आहे.
या भीषण हिंसाचाराच्या घटना घडत असताना स्थानिक प्रशासन आणि अंतरिम सरकार मात्र हातावर हात धरुन बसल्याचे चित्र आहे. कट्टरपंथी संघटना रस्त्यावर उतरुन उघडपणे धमक्या देत असतानाही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. सरकारच्या या मूक संमतीमुळेच हल्लेखोरांचे मनोधैर्य उंचावले असून ते निर्भयपणे अल्पसंख्याकांवर हल्ले करत आहेत. जेसोर आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक हिंदूंनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तक्रार घेऊनही योग्य कारवाई करत नसल्याने ते स्वतःला पूर्णपणे असुरक्षित समजत आहेत.
केवळ हत्याच नव्हे, तर हिंदूंच्या (Hindu) मालमत्तांनाही लक्ष्य केले जात आहे. अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि दुकाने पेटवून देण्याच्या घटना घडल्या आहेत. जमावाकडून होणारी मारहाण (लिंचिंग) हा तर आता दैनंदिन प्रकार झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या हिंदूंना संरक्षणासाठी कुणीही उरले नसल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक हिंदू कुटुंबे जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळांचा शोध घेत आहेत तर काहींनी भीतीच्या सावटाखाली स्वतःला घरांमध्ये बंद करुन घेतले आहे.
डिसेंबर 2025 पासून बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर आहे. या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका तिथल्या अल्पसंख्याक समुदायाला प्रामुख्याने हिंदूंना बसत आहे. मानवाधिकार संघटनांनी या घटनांचा निषेध केला असला तरी जमिनीवर परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. भारत सरकारनेही यापूर्वी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती, मात्र आता एकामागून एक होणाऱ्या हत्यांमुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गंभीर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
राणा प्रताप बैरागीच्या हत्येनंतर जेसोरमधील हिंदू समाजात संतापाची लाट आहे, पण हा संताप व्यक्त करण्याची हिंमतही कट्टरपंथीयांच्या धाकामुळे कुणी दाखवू शकत नाहीये. "आम्ही जगायचे कसे आणि कुणाच्या जोरावर?" असा आर्त सवाल बांगलादेशातील हिंदू विचारत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.