
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानात घुसून धडक लष्करी कारवाई केली. भारताने आपल्या कारवाईदरम्यान पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केले होते. या दहशतवादी तळांपैकीच एक लष्कर-ए-तोयबाचे मुरिदके येथील ट्रेनिंग सेंटर होते. मुरिदके येथील ट्रेनिंग सेंटर हे लष्कर-ए-तोबयाचा म्होरक्या हाफिज सईदचे घर म्हटले जाते. इथेच हरियाणाची युट्यूबर आणि स्पाय ब्युटी ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे ट्रेनिंग घेतले असल्याचे आता समोर आले आहे. ज्योती मल्होत्राच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होते आहेत. त्यापैकीच हा एक खुलासा आहे.
ट्रेनिंगनंतर, तिला येथून पुढील मोहिमेसाठी भारतात (India) पाठवण्यात आले होते. पण मोहिम सुरु करण्यापूर्वीच तिला हरियाणा पोलिसांनी पकडले. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. या काळात तिने मुरीदकेमध्येच 14 दिवस व्यतित केले होते.
हरियाणातील हिस्सार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खुलासा ज्योतीने स्वतः चौकशीदरम्यान केला. तथापि, या चौकशीतून अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की तिला मुरीदकेहून कोणत्या मोहिमेसाठी भारतात पाठवले होते. तसेच, या मोहिमेत तिच्याशिवाय आणखी किती लोक आहेत? या संदर्भात हिस्सार पोलिस तिची सतत चौकशी करत आहेत. सध्या ज्योती पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, या मोहिमेत ज्योती एकटीच सहभागी नाही तर तिच्याशिवाय 20 हून अधिक लोक यात सहभागी आहेत. हे सर्व 20 लोक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याचे सांगितले जात आहे.
ज्योतीला पाकिस्तानात (Pakistan) फिरण्यासाठी कोणतेही प्रतिबंध नव्हते. तिने पाकिस्तानात जिथे वाटेल तिथे मुक्तपणे प्रवास केला. यादरम्यान पाकिस्तान पोलिसांनी स्वतः तिच्या सुरक्षेची व्यवस्था केली होती. तिने अशा अनेक ठिकाणी भेट दिली जिथे सामान्य भारतीयांना जाण्यास मनाई आहे. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचे काही भाग, इस्लामाबाद, कराची आणि मुरीदके येथील काही ठिकाणांचा समावेश होता. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या सूचनेवरुन पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी शाकीर याने तिला ही सुविधा पुरवली होती.
पहलगाम हल्ल्यातही ज्योतीचा हात असू शकतो, अशी भीती हिस्सार पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, चौकशीदरम्यान तिने हे नाकारले आहे. असे असूनही पोलिसांचे म्हणणे आहे की, ज्योती पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी काश्मीरमध्ये होती. या काळात, ती पहलगाममधील त्या ठिकाणीही गेली जिथे दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारुन गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यानही ज्योती पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. या काळातही दोघांमध्ये संवेदनशील डेटाची देवाण-घेवाण झाली.
युट्यूबर ज्योती मल्होत्राला तिच्या पाकिस्तानी मित्रांकडून सतत फोन येत होते. यापैकी बहुतेक कॉल शाकीरचे होते. हा तोच शाकीर आहे, ज्याचा नंबर ज्योतीने जाट रंधावा म्हणून सेव्ह केला होता. तथापि, ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी या फोन कॉल्सबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितले की, ती व्हिडिओ बनवण्यासाठी पाकिस्तानात जायची. या काळात तिचे बरेच मित्र झाले. भारतात परतल्यानंतरही ती या मित्रांशी बोलत असे. यासोबतच त्यांनी त्यांच्या बाजूने एक प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की, आपल्या देशात आता मित्रांशी बोलणे गुन्हा झाला आहे का? यासोबतच हरीश मल्होत्रा यांनी पोलिसांना त्यांचा फोन आणि लॅपटॉप इत्यादी परत करण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.