

Shikhar Dhawan On Bangladesh Violence: बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक समुदायावर विशेषतः हिंदूंवर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. या गंभीर परिस्थितीने आता केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर क्रीडा विश्वातही संतापाची लाट निर्माण केली आहे.
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवन याने बांगलादेशातील एका हिंदू महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. एका हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार करुन तिला झाडाला बांधून ठेवल्याची अत्यंत क्रूर घटना समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिखर धवनने या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.
शिखरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. त्याने म्हटले की, बांगलादेशात एका हिंदू विधवेवर झालेल्या क्रूर हल्ल्याबद्दल वाचून माझे मन हेलावले आहे. जगात कुठेही आणि कोणाही विरुद्ध अशा प्रकारची हिंसा कदापि सहन केली जाऊ शकत नाही. त्याने पीडितेच्या समर्थनासाठी आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रार्थना केली. शिखर धवनने जरी 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो सामाजिक प्रश्नांवर नेहमीच सक्रिय असतो. सध्या तो विविध जागतिक क्रिकेट लीगमध्ये खेळत असून अलीकडेच तो कॅनडा सुपर 60 स्पर्धेत व्हाइट रॉक वॉरियर्सचा भाग होता.
बांगलादेशातील ही परिस्थिती गेल्या वर्षी शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून अधिकच बिकट झाली आहे. अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांवर, व्यवसायांवर आणि धार्मिक स्थळांवर सतत हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत किमान सहा हिंदूंची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी जेसोर जिल्ह्यात एका हिंदू उद्योजकाची आणि वृत्तपत्र संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच दिवशी शरत मणी चक्रवर्ती या हिंदू किराणा दुकानदारालाही आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी 3 जानेवारी रोजी शरियतपूर जिल्ह्यात खोकन चंद्र दास या 50 वर्षीय व्यक्तीवर हल्ला करुन त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. या घटनांमुळे तेथील हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची आणि सामाजिक तणावाची सावली आता क्रिकेटच्या मैदानावरही पडू लागली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त केल्यानंतर वादाला तोंड फुटले. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला.
भारत (India) हा या विश्वचषकाचा प्रमुख यजमान असल्याने बांगलादेशच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मोठ्या पेचात पडली आहे. सध्या आयसीसी बांगलादेश बोर्डाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरुन नियोजित विश्वचषक स्पर्धेवर कोणतेही संकट येऊ नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.