Cambodia Rescued 250 Indians: काही दिवसांपूर्वी भारतीय तरुणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला नेल्याचे प्रकरण समोर आले होते. यातच आता, कंबोडियात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कंबोडियातील भारतीय दूतावास नोकरी देण्याच्या नावाखाली बेकायदेशीर सायबर काम करण्यास भाग पाडणाऱ्या भारतीय नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, त्यांनी सुमारे 250 भारतीयांची सुटका करुन त्यांना परत मायदेशात आणले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ''परराष्ट्र मंत्रालय आणि कंबोडियातील भारतीय दूतावासाने अशा घोटाळ्यांबाबत भारतीयांना गाइडलाइन जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय भारतीय नागरिकांना मदत करण्यास कटिबद्ध आहे. आम्ही अशा फसव्या योजनांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी एजन्सीसोबत काम करत आहोत.''
दरम्यान, गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, ''अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे. यासंदर्भात आम्ही निवेदनेही जारी केली आहेत. चीन बिनबुडाचे दावे करतो. त्याच्या वारंवार बोलण्याने खरी परिस्थिती बदलेल हे शक्य नाही. त्यांनी लक्षात ठेवावे की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.''
त्याचवेळी, गुरुवारी, रशियन सैन्यात भारतीय तरुण सामील झाल्याबद्दल, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, आम्ही रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. नागरिकांच्या सुटकेचा मुद्दा आम्ही रशियापुढे तात्काळ उपस्थित केला. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह भारतात परत आले आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन म्हटले की, सध्या मंत्रालयात संचालक असलेल्या सीता राम मीना यांची नायजर प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.