
Mock Drill in India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मंगळवारी (6 मे) केंद्रीय गृह मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मॉक ड्रिलसाठी नागरिकांना कसे प्रशिक्षित करायचे याचा आढावा घेण्यात आला. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन केले जाईल. विशेष म्हणजे, 1971 नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचा सराव होत आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 दिवसांत तिन्ही लष्कर प्रमुखांकडून लष्करी तयारीचा आढावा घेतला. बैठकीत त्यांनी लष्करप्रमुखांबरोबर संभाव्य कृती योजनांवर चर्चा केली.
दरम्यान, मंगळवारी गृह सचिवांनी 244 नागरी संरक्षण जिल्ह्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली नॉर्थ ब्लॉकमध्ये ही बैठक पार पडली. बैठकीला राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. देशाच्या सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतांची चाचणी आणि सुधारणा करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 2010 मध्ये 244 नागरी संरक्षण जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचा प्रमुख उद्देश उद्या (बुधवार) होणाऱ्या मॉक ड्रिलची तयारी आणि समन्वय सुनिश्चित करणे होता. 2010 च्या अधिसूचनेनुसार, नागरी संरक्षण जिल्हे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले होते. श्रेणी-1 मध्ये नवी दिल्ली, सुरत, वडोदरा, काक्रापार, मुंबई, उरण, तरणपूर, तालचेर, कोटा, रावत-भट्टा, चेन्नई, कल्पक्कम आणि बुलंदशहर यांचा समावेश होता.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर संभाव्य कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना प्रत्येक वस्तुस्थिती सविस्तरपणे समजून घ्यायची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी तिन्ही सेनाप्रमुखांकडून त्यांच्या तयारीसंबंधी चर्चा केली. विशेष म्हणजे, उद्या होणारा 'मॉक ड्रिल' देखील या योजनेचाच एक भाग आहे.
हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवला जाईल.
कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण सामान्य नागरिक, विद्यार्थी इत्यादींना दिले जाईल.
ब्लॅकआउटची व्यवस्था केली जाईल. याचा अर्थ असा की, गरज पडल्यास वीज बंद करावी जेणेकरुन शत्रूला कोणतेही टार्गेट दिसू नये.
महत्त्वाचे कारखाने आणि तळ लपवण्यासाठी व्यवस्था केली जाईल.
आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासकीय यंत्रणेला तयार करण्यासाठी मॉक ड्रिल खूप महत्वाचे मानले जाते. त्याचवेळी, मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्यासंबंधी अलर्ट केले जाते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव कमालीचा वाढला असताना गृह मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली, यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक धोरणात्मक पावले उचलली, यामध्ये सिंधू जलवाटप स्थगित करणे, पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, अटारी चेकपोस्ट बंद करणे आणि सर्व श्रेणीतील टपाल सेवा बंद करणे यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.