Journalist Rajat Sharma: पत्रकार रजत शर्मा यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पक्षाचे दोन प्रवक्ते रागिणी नायक आणि पवन खेडा यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. न्यायालयाने आता याप्रकरणी अंतरिम दिलासा देण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी रजत शर्मा यांच्यावर इंडिया टीव्हीच्या स्टुडिओमध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावर जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी रागिणी नायक यांच्या आरोपांचे समर्थन केले होते. याप्रकरणी रजत शर्मा यांनी मानहानीचा खटला दाखल केला. काँग्रेस नेत्यांचे आरोप आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणारे असल्याचे शर्मा यांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटले.
दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांनी मंगळवारीच दिल्लीतील तुघलक लेन पोलीस ठाण्यात इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लाईव्ह टेलीकास्टदरम्यान रजत शर्मा यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी रजत शर्मा यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही नायक यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, रागिणी नायक यांच्याकडून करण्यात आलेले आरोप इंडिया टीव्ही ग्रुपने फेटाळून लावले. इतकेच नाही तर इंडिया टीव्ही ग्रुपने रागिणी नायक, काँग्रेस नेते पवन खेडा तसेच जयराम रमेश यांना आरोप मागे घेण्याचा इशारा दिला होता.
मात्र, काँग्रेस नेत्यांनी आरोप मागे न घेतल्याने शर्मा यांच्याकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. रागिणी नायक यांच्याकडून आरोप करण्यात आला होता की, लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी (4 जून रोजी) लाईव्ह टेलीकास्टदरम्यान रजत शर्मा यांनी आपल्याबरोबर गैरवर्तन केले. रागिणी नायक यांनी रजत शर्मा यांच्याविरुद्ध कलम 294 आणि 509 अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रजत शर्मा यांच्यावर आरोप करताना रागिणी नायक भावूक झाल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.